Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

अरे बापरे हे काय हायवेचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी मोहाडी पोलिसांचा बळी



शिरपूर प्रतिनिधी:तक्रार हायवे पोलिसांच्या गैरकारभाराबाबत केली आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशाने तपास करण्याचा बहाणा करुन पोलिस निरीक्षकाने भलताच अहवाल पाठवून मोहाडी पोलिस ठाण्याच्या तीन कर्मचार्‍यांना निलंबित करुन स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप पत्रकार रत्नदीप सिसोदिया यांनी केला.

या प्रकाराबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की,तीन नोव्हेंबरला सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान धुळे येथील हायवे पोलिस केंद्राबाहेर टेलिस्कोपिक क्रेन व अन्य वाहने अडवण्यात आलेली दिसून आली. त्याबाबत संबंधित वाहनचालकांकडे चौकशी करण्यासह प्रत्यक्ष पाहणी केली असता बेकायदेशीर पैशांची वसुली सुरु असल्याचे दिसले. त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तरे दिली. त्यामुळे महामार्ग पोलिस विभागाच्या पोलिस महासंचालकांकडे या सर्व प्रकाराबाबत ऑनलाइन तक्रार केली.

थेट वरिष्ठ स्तरावर तक्रार गेल्याने तिची गांभीर्याने दखल घेण्यात आली. या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश महामार्ग विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव यांना देण्यात आले. त्यांनी सदर प्रकार घडलेल्या हायवे पोलिस चौकीवर जाऊन चौकशी करणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मोहाडी पोलिस ठाण्याच्या तीन कर्मचार्‍यांवर हायवे वसुलीचा ठपका ठेवून त्याबाबत एसपी चिन्मय पंडीत यांना कळवले.वरिष्ठ स्तरावरुन तक्रार निपटण्याचे आदेश असल्यामुळे श्री पंडीत यांनी तिन्ही कर्मचार्‍यांना निलंबित केले.

प्रत्यक्षात मोहाडीतील कर्मचार्‍यांवर कारवाईची भूमिका घेण्याआधी त्याची पूर्वकल्पना बच्छाव यांनी दस्तुरखुद्द एसपी पंडीत यांना देणे चौकशी प्रक्रियेला धरुन होते. मात्र त्यांनी या अधिकार्‍यांना साधा फोन करण्याचीही तसदी घेतली नाही. तसे घडले असते एसपींनी श्री राजगुरु यांच्याकडे चौकशी केली असती, चौकशीची चक्रे फिरली तर तक्रार काय आहे, कोणाबाबत आहे याची शहानिशा होऊन हायवे पोलिसांच्या गैरकारभाराचे व सुनील बच्छाव यांच्या एकतर्फी कारवाईचे पितळ उघडे पडण्याची भीती होती.

म्हणून वरिष्ठांचा आदेश असल्याचा देखावा करुन त्यांनी निव्वळ मोटार व्हेईकल कायद्यानुसार कारवाई करीत हायवेवर कर्तव्य बजावणार्‍या तीन कर्मचार्‍यांवर थेट कारवाईची शिफारस एसपींना केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असून खोटा अहवाल पाठवून वरिष्ठांची दिशाभूल पीआय बच्छाव यांनी केली, मूळ दोषी नामानिराळे राहिलेच शिवाय तक्रारदाराचा तक्रारीमागील उद्देशच पूर्ण झाला नसल्याची भावना श्री सिसोदिया यांनी व्यक्त केली.

मुळात निरीक्षक सुनील बच्छाव यांची आजवरची कारकीर्दच वादाच्या भोवर्‍यात आहे. शिरपूर, धुळे, मालेगाव, पिंपळगाव, कन्नड, पाळधी, विसरवाडी असे चार जिल्ह्यातील हायवे पॉइंट त्यांच्या नियंत्रणात येतात. या पॉइंटद्वारे दरमहा 25 हजार रुपयांचा हप्ता कोणापर्यंत जातो, सुझलॉन प्रकल्पातील पवनचक्क्यांच्या अजस्त्र पात्यांची वाहतूक करणारी मोठी वाहने सोडण्यासाठी हजार रुपये, टेलिस्कोपिक क्रेनसाठी तीन ते चार हजार रूपये, गुरे वाहतूक करणार्‍या वाहनासाठी एक हजार, बकर्‍यांच्या गाडीसाठी 500 रुपये अशी वसुली केली जाते. त्याशिवाय पक्षी, फळे वाहतुकीसह नियमित वाहतुकीच्या वाहनांना दरमहा तीनशे रुपये याप्रमाणे हायवेचा अनधिकृत पास दिला जातो अशा तक्रारी आहेत. हायवे पॉइंटवर बदली हवी असेल लाखोंची रक्कम मोजावी लागते याची चर्चा खुद्द पोलिसांकडूनच केली जाते.

हा सर्व व्यवहार बिनबोभाट व सुरळीत सुरु राहण्यासाठी हायवेवरच्या कर्मचार्‍यांना पूर्णत: मोकळीक दिली जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे कारण नसतांना बंदोबस्ताच्या नावाने हायवेवर तासन्तास वाहने उभी करुन ठेवली जातात. कायद्याची कोणतीच भीती न बाळगता, कर्तव्याची जाणीव न ठेवता सरसकट प्रत्येक वाहनचालकाकडून रक्कम वसूल केली जाते. प्रसंगी चालकांना मारहाण केली जाते.

अशा गैरप्रकारांविरोधातआवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यावर वरिष्ठांची दिशाभूल करुन खोटा अहवाल देऊन मूळ दोषींना पाठिशी घालणे, तक्रारीच्या उद्देशाला हरताळ फासणे असे गंभीर कृत्य पोलिस निरीक्षक़ सुनील बच्छाव यांनी केले असून त्याविरोधात संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दाद मागितली असल्याचे रत्नदीप सिसोदिया यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध