Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १७ जानेवारी, २०२१

औरंगाबादचं 'संभाजीनगर' करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला..!



मुंबई प्रतिनिधी:औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसवर खोचक टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.'राज्यातील आमच्या सहकारी पक्षाला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळंच त्यांनी हा नामांतराचा 'सामना' सुरू केला आहे,'असा टोला थोरात यांनी हाणला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तील लेखातून औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. औरंगजेबाच्या इतिहासाची उजळणी करत इतिहास पुन्हा वाचण्याचा सल्लाही दिला होता. राऊत यांच्या या टीकेला थोरात यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं आहे.

'औरंगाबादच्या नामांतरावरून सध्या धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,' असा रोकडा सवाल थोरात यांनी केला आहे.

'गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्त्वाचा आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. 'भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

'छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही.आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर व खंबीर आहे.तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनविले आहे.एकमताने किमान समान कार्यक्रम ठरविला आहे.हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या,गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे.भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही.त्यामुळं कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही,असं थोरात यांनी भाजपला सुनावलं आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध