Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ मे, २०२१

शेती व पिण्यासाठी अनेर धरणाचे पाणी तात्काळ सोडण्याची आ. काशिराम पावरा यांची सूचना,



शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील अनेर धरणाचे पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी तात्काळ सोडण्यात यावे अशा सूचना शिरपूर तालुक्याचे आमदार आ. काशिराम पावरा यांनी  दिल्या असून सोमवार दि. ३ मे पर्यंत पाणी सोडले नाही तर आत्मदहनाचा इशारा यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दिला.

अनेर धरणाचे पाणी अनेर नदी मध्ये व चारी मध्ये तात्काळ सोडण्यात यावे याबाबतचे पत्र आमदार काशिराम पवार यांनी शिरपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना २० एप्रिल २०२१ रोजी दिले होते. परंतु वरिष्ठ पातळीवरून अहवाल आला नाही या कारणावरून अनेर धरणाचे पाणी अद्याप पर्यंत सोडण्यात आलेले नाही.

याबाबत आमदार काशिराम पावरा यांनी शिरपूर येथे आमदार कार्यालयात तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तालुक्यातील काही पदाधिकारी व शेतकरी यांची शुक्रवारी दि. ३० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता बैठक बोलावली.

यावेळी आ. काशिराम पावरा यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना संचालक भरत पाटील, पिळोदा येथील उपसरपंच योगेश बोरसे, घोडसगाव सरपंच हुकुमचंद पाटील, उपसरपंच पितांबर धनगर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. के. राजपूत आदी उपस्थित होते.

या बैठकीत आ. काशिराम पवार म्हणाले की, अनेर धरणात सध्या ६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना पाण्याची प्रतिक्षा असून अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व गुराढोरांना देखील पाण्याची मोठ्या प्रमाणात नितांत गरज आहे. हे सर्व लक्षात आणून दिल्यावर देखील अधिकारी तातडीने अंमलबजावणी का करत नाहीत, याबाबत आमदारांनी संताप व्यक्त केला. 

तसेच फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही कडक शब्दात सुनावणी केली. लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नदीत व चारीत पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शेतकरी यांनी सोमवार पर्यंत पाणी सोडले नाही तर आम्ही असंख्य शेतकरी आत्मदहन करू असा इशारा दिलेला आहे.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यावेळी संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, दरवर्षाप्रमाणे नियोजन करून अनेर नदीत व चारीत वेळेत सोडले पाहिजे. शेतकरी बांधवांनी मागणी करण्याची वाट न पाहता व आमदारांनी आदेश देण्याची देखील वाट न पाहता पाटबंधारे विभागाने वेळेवर आपले काम का केले नाही. मुबलक जलसाठा उपलब्ध असतानाही शेतीसाठी तसेच शेतकरी, गुरेढोरे व असंख्य गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या सोयीसाठी हे पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. हे पाणी सोडले नाही तर त्याची वाफ होऊन पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत सोमवार पर्यंत मागणीची दखल घेतली गेली नाही तर माझ्यासह असंख्य शेतकरी बांधव आत्मदहन करतील असा इशारा यावेळी के. डी.पाटील यांनी पाटबंधारे विभागाला दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध