Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

सांगवी येथे घडलेली दंगलीची घटना अतिशय दुर्दैवी, शिरपूर तालुक्याची शांततेची परंपरा कायम राहावी यासाठी सर्वांनी शांतता बाळगावी



शिरपूर प्रतिनिधी :- तालुक्यातील सांगवी येथे घडलेली दंगलीची घटना अतिशय दुर्दैवी असून शिरपूर सारख्या शांतताप्रिय तालुक्यात अशी घटना घडायला नको होती.या दंगली मागे असामाजिक तत्व काम करत असल्याचे दिसून येत असून तरुण पिढीला भडकवण्याचे व त्यांना चुकीच्या मार्गाने लावण्याचे काम काही समाजकंटक करत असल्याचे दिसून येत आहे.कोणीही कोणत्याही अफवांना बळी न पडता शिरपूर तालुक्याची शांततेची परंपरा कायम राहावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन जी दंगल घडली,ही घटना अतिशय क्लेशदायक, दुःखदायक असून शांतताप्रिय शिरपूर तालुक्याच्या परंपरेला बिलकुल न शोधणारी घटना घडली आहे.

शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा हे अतिशय संयमी,अध्यात्मिक, कुठल्याही वाईट गोष्टींपासून नेहमीच दूर राहणारे असे साधे सरळ व्यक्तिमत्व आहे. जमावाला समजावण्यासाठी गेल्यावर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर आमदार काशिराम पावरा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना खूपच दुर्दैवी व दुःखदायक आहे. तहसीलदार,पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्यासारख्या घटनांनी मी खूप व्यथीत झालो आहे. कोणीतरी राजकीय फायद्यासाठी चिथावणी देऊन,युवकांना भडकवून असे कृत्य केलं असेल तर शिरपूर तालुका कदापी अशा लोकांना माफ करणार नाही.शिरपूर तालुक्याची शांतता अबाधित राहावी यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो.शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी,सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी,आदिवासी बांधवांच्या नेहमीच प्रगतीसाठी गेल्या 35 वर्षांपासून आम्ही अहोरात्र काम करत आहोत.पूर्वनियोजित कट असल्यासारखी ही घटना घडल्याचे दिसून येत असून कृपया तरुण पिढीने, युवकांनी,आदिवासी बांधवांनी अशा कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये.तसेच व्यसनापासून दूर राहून सर्वांनी चांगले जीवन व्यतीत करावे असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

कोणताही अनुचित प्रकार घडला तर आपलेच नुकसान होते, आपला तालुका मागे पडेल. सामंजस्याची व सहकार्याची भूमिका लक्षात ठेवून सर्वांनी चांगल्या भावनेने काम करावे. तालुक्याच्या भल्यासाठी पुढे यावे. आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येकाला आमच्या कुटुंबातील सदस्य समजतो व त्या दृष्टीने सर्वांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतो.यापुढे शिरपूर तालुक्याच्या भल्यासाठी,शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेतून मार्गक्रमण करावे.कोणत्याही भूलथापांना, अफवांना बळी पडू नका असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध