Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी,अंतिम टप्प्यात आलेल्या द्राक्षबागा गहू,कांदा,भाजीपाला पिकांचे नुकसान.





बापू चव्हाण नाशिक

दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटसह दमदार हजेरी लावली त्यामुळे अंतिम टप्प्यात काढण्यासाठी आलेल्या द्राक्षांचे तसेच गहू,हरभरा,कांदे,व इतर भाजीपाल्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.
याशिवाय या पावसामुळे विद्युत पुरवठा देखील खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला उशिरापर्यंत वीज नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
      गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा देखील तडाका वाढला होता त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत होता.आज मात्र अवकाळीने सायंकाळच्या वेळेस दमदार हजेरीच लावल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली याशिवाय तालुक्यात आज हनुमान जयंती निमित्ताने अनेक ठिकाणी भाविकांनी भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.तर काही ठिकाणी आज यात्रा देखील होत्या काही ठिकाणी सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.परंतु अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे भाविक भक्तांच्या आनंदावर विर्जन पडले.याशिवाय सध्या महिला वर्गामध्ये वाळवण पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असल्याने या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे महिलांमध्ये देखील नाराजी पाहावयास मिळाली.
       यावर्षी तालुक्यामध्ये द्राक्षबागां आल्या नसल्याने आधीच शेतकरी हैराण होते ज्या द्राक्षबागा आलेल्या आहे त्या द्राक्षांचे दोन पैसे मिळतील असे शेतकऱ्यांना वाटत होते.मात्र निसर्गाच्या या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून आधीच माहागाईच्या कचाट्यात सापडलेले शेतकरी नागरिक या संकटातून कसे सावरतील हा देखील प्रश्न भेडसावत आहे.यावर शासनाने त्वरित उपाययोजना करून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध