1972 पेक्षाही भीषण आणि भयंकर दुष्काळाला महाराष्ट्राची ग्रामीण जनता तोंड देत आहे. त्यात मान्सून लांबणार असल्याची बातमी उरात धडकी भरवणारी आहे. मान्सूनपूर्व ढगांचा पुंजकाही आकाशात दिसत नाही. दिसतेय ती केवळ दुष्काळी गिधाडांची फडफड. हा धोका ओळखून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारने आधीच यंत्रणा सज्ज केली हे बरे झाले, पण दुष्काळ घालवायचा तर निसर्गाचीच साथ हवी. अवघा दुष्काळग्रस्त महाराष्ट्र आज उत्तम पावसाळ्यासाठी प्रार्थना करतो आहे. ‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर जणू आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले आहे, पण निसर्गाला दया येईल काय? पाऊस पडेल काय..?
ये रे ये रे पावसा!
पावसाळ्याचा पहिला महिना आजपासून सुरू होत आहे. आजवर कधीही पाहिली नाही एवढ्या आशाळभूतपणे अवघा महाराष्ट्र पावसाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहे. मात्र दुष्काळाच्या तडाख्यात भाजून निघालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. अंगाची काहिली करणारे ऊन, गावागावात भडकलेला दुष्काळाचा वणवा, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, शेतशिवारे आणि फळबागांचे झालेले वाळवंट अशा भयंकर परिस्थितीत महाराष्ट्राची ग्रामीण जनता उन्हाळ्याचा शेवटच्या टप्प्यातील एक एक दिवस मोठय़ा मुश्किलीने पुढे ढकलत आहे. आभाळाकडे आणि हवामान खात्याच्या अंदाजाकडे टक लावून बघण्याखेरीज जनतेच्या हाती काही उरले नाही, पण दिलासा मिळावा अशी वार्ता कुठूनच येत नाही. एरवी मे महिन्याच्या अखेरीस कोसळणाऱया वळवाच्या किंवा रोहिण्यांच्या सरी तरी कोसळतील अशी भाबडी आशा ग्रामीण जनता बाळगून होती, मात्र निसर्गाने तीही फोल ठरवली. मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वी वातावरणातील उष्मा कमी करण्याचे काम वळीवाचा पाऊस करत असतो. मात्र निसर्गराजाची अवकृपाच अशी झाली की ना पावसाळ्याचा पाऊस पडला, ना अवकाळी पाऊस, ना आता मान्सूनपूर्व वळीवाचा पाऊस. रोहिणी नक्षत्र संपण्यासाठी जेमतेम 24 तास उरले आहेत. तथापि
रोहिण्यांचा पाऊस
तर सोडा आकाशात तशा कुठे खाणाखुणाही दिसत नाहीत. या कालावधीत वातावरणात जो बदल दिसायला हवा तोही दिसत नाही. उलट जिकडे पहावे तिकडे उष्णतेचीच लाट. त्यामुळे दुष्काळात आधीच होरपळून निघालेल्या जनतेला उन्हाळ्याचे हे अखेरचे दिवस असह्य झाले आहेत. मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भात कधी पोहचणार याविषयी हवामान खात्याचे अंदाज काय आहेत याकडे जनता लक्ष ठेवून आहे. तथापि हवामान खात्याकडून मान्सून लांबणीवर पडणार असल्याच्याच बातम्या ऐकावयास मिळत असल्याने ग्रामीण जनजीवन हवालदिल झाले आहे. त्यात येत्या आठवडय़ात उष्णतेची आणखी तीक्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुष्काळाच्या राक्षसाने ज्या भागातील पाणीसाठे आधीच गिळंकृत केले त्याच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या काही दिवसांत उष्णतेचा तडाखा वाढेल असे हवामान खात्याने जाहीर केल्यापासून तर जनतेची पाचावर धारण बसली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरणच नाही त्यामुळे मृग नक्षत्रही कोरडे जाण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. अंदमानातून झेपावणारा मान्सून वेगवान वाऱयांअभावी गतीच घेत नसल्याने तो केरळमध्ये दाखल होण्यासाठीच जूनचा दुसरा आठवडा उजाडणार आहे. तेथून पुढे
वातावरण अनुकूल राहिले तर
केरळमधून महाराष्ट्रात पोहचण्यासाठी किमान आठवडा लागतो. कोकण, मुंबई व्यापून उर्वरित महाराष्ट्रात पोहचण्यासाठी आणखी तीन-चार दिवस लागतात. याचा अर्थ 17 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल आणि दुष्काळग्रस्त मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून सक्रिय होण्यासाठी जूनचा अखेरचा आठवडा उजाडेल. हा अंदाज जर खरा असेल तर तो भयंकर आहे. आधीच निम्म्याहून अधिक महाराष्ट्रातील जलसाठे पूर्णपणे आटले आहेत. खरीप आणि रब्बीचे पीक तर दुष्काळाने फस्त केलेच, पण मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी इत्यादी फळांच्या बागाही दुष्काळाच्या भक्ष्यस्थानी पडल्या. 1972 पेक्षाही भीषण आणि भयंकर दुष्काळाला महाराष्ट्राची ग्रामीण जनता तोंड देते आहे. त्यात मान्सून लांबणार असल्याची बातमी उरात धडकी भरवणारी आहे. मान्सूनपूर्व ढगांचा पुंजकाही आकाशात दिसत नाही. दिसतेय ती केवळ दुष्काळी गिधाडांची फडफड. हा धोका ओळखून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सरकारने आधीच यंत्रणा सज्ज केली हे बरे झाले, पण दुष्काळ घालवायचा तर निसर्गाचीच साथ हवी. अवघा दुष्काळग्रस्त महाराष्ट्र आज उत्तम पावसाळ्यासाठी प्रार्थना करतो आहे. ‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर जणू आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले आहे. पण निसर्गाला दया येईल काय? पाऊस पडेल काय..?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा