Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

एकाच टॉवरवर चार चार कंपन्यांचा संसार चालू...!बामखेडा परीसरात मोबाईल रेंज गायब..!



तोरखेडा प्रतिनिधी:बी.एस.मण्यार:विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नेत्र दिपवून टाकणारी प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात वाड्यावस्तीत विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. 

बामखेडा(ता.शहादा) परीसरात स्वतंत्र  विविध कंपन्याचे  मोबाईल रेंजसाठी टॉवर उपलब्ध असून  मोबाईल धारकांना  पुरेसा रेंज  मिळत नसल्याने  मोबाईल धारक  त्रस्त झाले आहे.गेल्या काही महिन्यात मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः सर्वच पातळ्यांवर मेटाकुटीला आणले आहे. 

4 जी सेवा असताना बामखेडा परीसरात मोबाइलला 2 जी किंवा 3 जी मोबाइलची रेंज मिळत आहेत. इंटरनेटची परिस्थितीत तर याहून वाईट असून डिजिटल इंडियाचा बोऱ्या वाजला आहे. स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडविण्यासाठी एकाच टॉवरवर चार चार कंपन्यांचा संसार चालू आहे.कंपन्यांच्या वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत कोठेही तक्रार केली. 

तरी “व्हॉट ऍन आयडीया सरजी’ चे प्रत्यंतर अनुभवायला मिळत आहे.परीसरात सध्या अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहेत. मात्र, यापैकी अपवाद वगळता बहूतेक कंपन्यांच्या सेवेचा येथे पूरता फज्जा उडाला आहे. 

ज्या पटीत या कंपन्या अथवा त्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्याचपटीत संबंधित कंपन्यांचे टॉवर नाहीत. तर त्या टॉवरची ग्राहक क्षमता न लक्षात घेता त्यापेक्षा कितीतरी पटीने ज्यादा ग्राहक झाल्याने मग संबंधित सेवेवर विपरीत परिणाम झाले आहेत. सध्या मोबाईल नेटवर्क समस्येने गंभीर रूपधारण केले आहे. मागील कित्येक महिन्यांपासून

बी.एस.एन.एलपासून अन्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी गुडघे टेकले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात मोबाइल नेटवर्क सेवा सुविधेचा फज्जा उडाला असल्याने नागरिकांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे.येथील इंटरनेट सेवेसह मोबाइल रेंज अनेक महिन्यांपासून गायब झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यंत्रणा कार्यान्वित असली तरी अनेकदा डायल करूनही एखादा कॉल लागला तर ती मोठी गोष्ट म्हणावी लागेल. रेंजमध्ये असतानाही आऊट ऑफ रेंज, नॉट रिचेबल अशी उत्तरे तर सातत्याने नेटवर्क बिझीचा कहरला हजारो ग्राहक वैतागले आहेत.एका बाजूला सेवेची बोंबाबोंब असली तरी दुसरीकडे मात्र बिलापोटी भरमसाठ रक्कमांनी ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा उद्योग मोबाईल कंपन्याकडुन राजरोसपणे सुरू आहे. 

कित्येकदा रेंजच गायब असते, रेंज असेल तर लाइन व्यस्त असतात त्यामुळे बराचकाळ कॉल लागत नाही. मधूनच नेटवर्क गायब होते नाही तर कॉलमध्ये कंजेक्‍शन ठरलेलेच. यातूनही नशीब बलवत्तर असेलच तर कॉल लागतो याचे समाधान घेण्यापूर्वीच तो बंदही पडतो.
यासोबतच इंटरनेट सेवामधील अवस्थाही यापेक्षा दयनीय झाली आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून तालुक्‍यात सातत्याने मोबाईल यंत्रणा ठप्प होऊ लागली आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे या गोष्टीकडे लक्ष वेधूनही त्यांचेकडून दुर्लक्षच होते आहे. मात्र, यावेळेला ग्राहकांत संतापाची लाट पसरली असून सर्वच ठिकाणी तशा भावना व्यक्त होत आहेत. 

त्यामुळे संबधीत मोबाईल सेवा देणाऱ्या टाँवर कंपनीने   वेळीच कुचकामी यंत्रणेला सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध