Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

पोलिस दलास कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्डची मोठ्या प्रमाणावर मदत होते. या होमगार्ड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती



राज्यात कार्यरत होमगार्डना नियमित स्वरूपात १८० दिवस काम देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याच्या सूचना आणि होमगार्डना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल, यासंदर्भात विमा कंपन्याशी तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याचे निर्देश गृहमंत्र्य़ांनी बैठकीत दिले.
होमगार्डसाठी असलेले अनुदान, कर्तव्य भत्ता अदा करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून देणे, एका आठवड्याच्या आत कर्तव्य भत्ता अदा करणे, मानसेवी अधिकाऱ्यांची नियुक्ती, राज्य सुरक्षा महामंडळाचे लेखापरीक्षण, प्रलंबित सुरक्षा शुल्क वसुली यांसह विविध समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
 राज्यासाठी केंद्र शासनाने ५३ हजार होमगार्डची संख्या निश्चित केलेली आहे. सद्यस्थितीत रिक्त असलेल्या होमगार्डच्या पदांच्या भरतीसंदर्भात कार्यवाही करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या. अपात्र १७०४ होमगार्डना पुन्हा संघटनेमध्ये सामावून घेण्यात आले आहे. त्यांना नियुक्ती देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच नियमितपणे साप्ताहिक कवायती सुरु कराव्यात, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. वयाची ५० ते ५५ वर्षे पूर्ण झालेल्या होमगार्डची शारीरिक पात्रता तपासण्याच्या अटीबाबत साकल्याने निर्णय घ्यावा, होमगार्डच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागासाठी आवश्यक असणारे वाहनचालक,चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी केल्या.
महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये सध्या सुमारे ९ हजार जवान कार्यरत आहेत. सुमारे २१७ संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी या महामंडळाकडे आहे. सद्यस्थितीत विविध आस्थापनांकडे ६९ कोटी सुरक्षा शुल्क थकीत आहे. ही वसुली प्राधान्याने करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध