Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

राज्यातील एकूण ४१ गावे पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता; पूर्ण योजनेसाठी १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर.-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील



राज्यात 41 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाही लवकरच मार्गी लागणार; मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश...
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज बैठक पार पडली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशाकीय मान्यता देऊन याबाबतचे आदेश सुपूर्द केले. धुळगावसह १८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य अभियंता सुभाष भुजबळ,अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे, कार्यकारी अभियंता सुजित मोरे, आमदार नरेंद्र दराडे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अडतीस गाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी १६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर धुळगावसह १८ गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाही लवकरच मार्गी लावण्यात येणार असून याबाबत तातडीने तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तसेच धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज बैठक पार पडली. या बैठकीत  राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
"येवला मतदारसंघ टँकरमुक्त करणार"
कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेल्या येवला मतदारसंघाला टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न  केला जात असून मतदारसंघातील राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह अठरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजना पूर्ण झाल्यानंतर येवला मतदारसंघ हा टँकरमुक्त होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सदरील पाणी पुरवठा योजनेसाठी नांदूरमधमेश्वर धरणातून पाणी उचलले जाणार आहे. यासाठी ३.७३७ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदूरमधमेश्वर धरणातून हे पाणी शुद्धीकरणासाठी येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आवश्यक असलेली जागा खासगी वाटाघाटीतून उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यवाही करत आहेत. 
सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. पन्हाळसाठे येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे.
तसेच येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांवसह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेचे मंजुरीचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ५८ कोटी ८१ लक्ष इतका निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असून या योजनेचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.
येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिंचोली बु., चिंचोली खु., सताळी, बदापूर या गांवाचा समावेश आहे. या सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण येवला तालुका हा टँकरमुक्त होणार आहे.
त्याचप्रमाणे यशस्वीपणे चालू असलेली ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील प्रत्येक झोन मधील पाणी उपसा पर्यायी सयंत्रे अकार्यक्षम आणि नादुरुस्त झाले आहे. त्याची सुद्धा दुरुस्ती आणि पंप हाऊस मधील पंप बदलीकरणे गरजेचे आहे अशी सूचना देखील केली. जलजीवन मिशन मधून रेट्रोफिटिंग योजनेतून हे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध