Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ मार्च, २०२२

महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा आणि ईडी..

एरव्ही व्यापारी,उद्योजक,सिनेअभिनेते यांचेवर सीबीआय,इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली की देशाच्या नागरिकांना आपली लोकशाही व्यवस्था जागृत,शाबूत आणि मजबूत असल्याची खात्री वाटायची.पूर्वी या केंद्रीय तपास यंत्रणांना फारशी कामेही नव्हती किंवा त्यास तेवढी प्रसिद्धी नव्हती.कर चोरी,काळा पैसा,अपसंपदा,एका देशातून दुसऱ्या देशात पैशांची अफरातफरी यांचा तपास करणे ही या संस्थांची महत्वाची कामे त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाने चालू असायचे आणि त्यांच्या कामावर प्रसार माध्यमाचा प्रकाश ही पडायचा नाही.काँग्रेस सरकारच्या काळात या संस्थांचा गैरवापर झाला असे बरेच वेळा आरोप देखील झाले.त्याच काळात सुप्रीम कोर्टाने सीबीआयला पिंजऱ्यातला पोपट असे म्हटले व त्यांचा गैरवापर होतो आहे यावर शिक्कामोर्तब केले होते. केंद्रीय तपास यंत्रणा चा राजकीय फायद्यासाठी वापर करणे या ना त्या कारणाने सत्तेतील कोणताही पक्ष करत असतो. त्याला भाजप देखील अपवाद नसेलच.

महाराष्ट्राची 

राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक , शैक्षणिक अशी परंपरा आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च दर्जाचा सुसंस्कृतपणा देखील आहे.तसा पाहता तो राजकीय वारसा महाराष्ट्रातील बऱ्याच पुढाऱ्यांना खानदानी वारसाहक्काने लाभलेला आहे हे म्हणायला हरकत नाही.

कारण राजकीय,सांस्कृतिक,सभ्यपणा वारसाहक्काने लाभलेले पिढी महाराष्ट्राचे राजकारणात नेहमी अग्रेसर राहिली आणि त्यांनी देश पातळीवर देखील मराठी माणसाचे नाव मोठे केले.महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांचे मग ते सरकारी पक्षातील असो की विरोधी पक्षातील नेहमी स्नेहाचे,जिव्हाळ्याचे व कौटुंबिक मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत.सर्वसामान्य लोकांचा विकास होईल आणि तो होतच राहील परंतु आपल्या वारसांनी पुढील सात पिढीला पुढे पुरेल एवढा आर्थिक व स्थावर मालमत्तेचा साठा त्यांना मिळेल ही विकासाची योजना चुकणार नाही ना याची काळजी मात्र त्यांनी घेतली आहे.

या अगोदर राजकीय पुढाऱ्यांनी मग ते सरकारी पक्षातील असो की विरोधी पक्षातील एकमेकांना अडचणीत आणायचे नाही,वैयक्तिक चारित्र्यावर चिखलफेक करायची नाही,एकमेकांच्या भ्रष्टाचा- राबद्दल,घोटाळयांबद्दल बोलायचे नाही असा त्यांचा मूक करार होता. तेरी भी चूप मेरी भी चुप , कोणीच कोणाच बोलायचं नाही.तुझी ही पाची बोटे तुपात आणि माझीही पाची बोटे तुपात सर्वसामान्यांचं काहीही होवो ही नीती त्यांची होती.

सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे.भाजप सर्वात मोठा पक्ष असुन त्याची केंद्रात सत्ता आहे.पण महाराष्ट्रात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी भाजपाचे तोंडचे पाणी पळवले आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.२०१९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये घातपाताच्या, विश्वास - घाताच्या हत्यारांनी झालेले सत्तांतर हे जनतेला कितपत मान्य होते ही गोष्ट वेगळी आहे,पण ते जनतेला कधीही न पडलेले स्वप्न होते हे मात्र नक्की आहे. या सत्तांतराच्या निमित्ताने विश्वास-घाताने,संशयाने आणि अहंकाराने महाराष्ट्राचे राजकारणात आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मनात शिरकाव केला.

खेकड्याची वृत्ती जागी होऊन खेचाखेची चे राजकारण सुरू झाले.कोण मंत्री काय काम करतो ? कोणते निर्णय घेतो? कोणते चुकीचे काम करतो ?आणि त्याचे कच्चे दुवे काय ? तो कसा अडकेल ? याचा अभ्यास करण्याची जुनी सवय भाजपच्या पुढाऱ्यांनी पुन्हा जागृत केली. यामागे वावगे देखील काही नाही. ज्याप्रकारे भाजपच्या पुढाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचे घोटाळे उकरून काढायला सुरू केले त्यावरून महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतमजूर यांना नवल वाटत आहे की आम्ही भुईमुगाच्या शेतातील मातीमध्ये असलेल्या शेंगा जेवढे लवकर शोधत नाही त्यापेक्षा तुमचा वेग खूप जास्त आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेने विरोधी पक्ष म्हणून त्यांचे आभार देखील मानायला हवेत.

ज्या पद्धतीने भाजप पक्षाने शोध मोहीम राबवून केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावा द्यायला सुरुवात केली आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा ज्या झपाट्याने कारवाया करत आहेत हे स्वागतहार्याच आहे . राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षांनी व त्यांच्या पुढाऱ्यांनी हा केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा कांगावा सुरू केला आहे.तो मात्र सर्वसामान्य माणूस म्हणून याकडे पाहत असताना मनाला न पटणारा आहे.महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना आज पर्यंत राजकीय पुढार्‍यांवर धाडी पडल्याचे पाहण्यात किंवा ऐकिवात नव्हते. पुढार्‍यांचे घोटाळे उघडे होत नाहीत. त्यांच्यावर कारवाया होत नाहीत. त्यांच्या केसालाही कोणी धक्का पोहोचू शकत नाही. हा संदेश महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत रुजला होता.एखादा गावगुंड अवैध मार्गाने पैसे जमवून तो दडपण्यासाठी राजकारणात दादा,भाऊ, नेते म्हणून इंट्री करायचा.या राजकीय रस्सीखेच च्या निमित्ताने सुरू झालेल्या करवाईतून तरी कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे सर्वसामान्यांना कळायला लागले आहे हे तेवढेच महत्त्वाचे आहे.

सर्वसामान्य गोर-गरीब,दीन-दलित , पीडित-वंचित यांना तूम्हा पुढार्‍यांवर होत असलेल्या या केंद्रीय तपास यंत्रणांचे गैरवापराचा,तुमच्या वैयक्तिक संपत्तीवर, तुम्ही केलेल्या चुकीच्या कामासाठी होत असलेल्या कारवाईबद्दल काही वावगे वाटत नाही.तुम्ही लोकांनी या तुमच्या वैयक्तिक संकटाला देशासमोरील संकट , दहशतवादी मानसिकता असे शब्दप्रयोग केले तरी दोन वेळेचे जेवणाची भ्रांत असलेल्या या सर्वसामान्य लोकांना तुमच्या होत असलेल्या अन्यायापेक्षा त्याचे पोटाची चिंता जास्त सतावते आहे हे तुम्ही विसरू नका. इतरांवर कारवाया होतात परंतु या निमित्ताने का होईना तुमच्यावर कारवाया होत आहेत हे खूप महत्त्वाचे आहे.

सर्वसामान्यांचा विकास होईल तो होतच राहील फक्त त्याचा वेग आणि त्यातील अडथळे दूर करायचे काम सरकार म्हणून तुम्हा पुढाऱ्यांना आणि व्यवस्थेला करायचे आहे.त्यामुळे सर्वसामान्य वर रोज कारवाई होते त्याचे नवल नाही परंतु या राजकीय वैमनस्यातून आपले कडे कारवाईचा हा वळलेला मोर्चा ला यश प्राप्त होवो. कारवाई करणारी ही ईडी ( enforcement directorate ) माय महाराष्ट्रातील राजकारणाला आणि राजकीय पुढाऱ्यांना भ्रष्टाचार अपसंपदेच्या विळख्यातून मुक्त कर एवढच साकडं

🖋लेखक :- एम.अजितकुमार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध