Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

आजच्या युवकांनी संसदीय कामकाज समजून घेत आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी पुढे येणे काळाची गरज युवा संसद कार्यशाळेत प्राचार्य बी. एम. भामरे यांचे प्रतिपादन



साक्री- आजच्या युवकांनी संसदीय कामकाज समजून घेत, देशाचे एक सक्षम नेतृत्व बनत, एक अखंड भारत, श्रेष्ठ भारत व आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी पुढे येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य बी.एम.भामरे यानी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै. डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय साक्री, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 एप्रिल ते 7 एप्रिल 2022 या तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय "युवा संसद" कार्यशाळेचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मौजे शेवाळी येथील शांतिवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून श्री छत्रपती शिवाजी इंग्लीश मिडीयम स्कूल साक्रीचे प्राचार्य बी.एम्‌. भामरे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती डॉ.मंगलाताई देसले होत्या. तर प्रमुख पाहूणे व कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.मोहन टी.पावरा, शान्तीवन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन अरुणजी नेरकर, अन्य व्याख्यात्यांमध्ये डॉ.नितीन माळी व  डॉ.ए.बी.महाजन, जिल्हा समन्वयक डॉ. एच.एम.शेख़ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस. सोनवणे उपस्थित होते. दिनांक 5 एप्रिल रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी व सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते करून या  कार्यशाळेचे उद्घाटन  करण्यात आले.  या कार्यशाळेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 80 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ.पावरा यांनी कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडींचा व घटनांचा नियमित आढावा घेण्याचे व कार्यशाळेत विविध विषयांवरील व्याख्यानांचे आपापसात विश्लेषण करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेस प्रमुख वक्ते  म्हणून बोलताना प्राचार्य बी. एम. भामरे यांनी युवकांना, ‘‘आपण कोण व आपले सामर्थ्य काय आहे?’’ हे समजावून सांगत, देशाच्या सकारात्मक बदलाची आपल्याकडूनच अपेक्षा असल्याचे सांगितले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षिलेल्या 'युवा संसदेच्या' माध्यमातून आपल्या देशाला  तथा लोकशाहीला कमकुवत करणाऱ्या वंश वादाला छेद देणारे, प्रामाणिक, सक्षम व नवी दिशा देणारे नेतृत्त्व तयार होईल अशी आशा असल्याचे नमुद केले. या पार्श्वभूमीवर  ही कार्यशाळा सहभागी विद्यार्थ्यांमध्ये  राजकीय चेतना निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला  व शेवटी देशाच्या  संसदेची महतीही सांगितली.
या प्रसंगी धुळे जिल्हा विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ.एच. एम. शेख़  यांनी विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविल्या जातात याविषयी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे यांनी आपल्या मनोगतात आजच्या युवा संसद  कार्यशाळेतून विद्यार्थ्यांनी भविष्यातील राजकीय हिताच्या दृष्टिकोनातून ज्ञान प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन  डॉ. मंगलाताई देसलेंनी, भारतीय राजकारणात तरुणाईची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत असल्या कारणाने युवकांनी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडी अभ्यासाव्यात, अशा अपेक्षा व्यक्त करत लोकसभा व राज्यसभेची  संख्या व त्यांचे कामकाज कसे चालते याची विस्तृत माहिती दिली व कार्य शाळेस शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. व्ही. पी. पाटील यांनी तर, प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा. डी. एल. पाटील यांनी केले.  पाहुण्यांचा परिचय व आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. अजय पी. नांद्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव साक्री

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध