Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

सरकारवर पोलीस नाराज, शिंदे–फडणवीसांमधील मतभेदमुऴे पाेलीसांच्या बदल्या वेटिंगवर......




(मुंबई प्रतिनिधी)सरकार स्थापन होऊन चार महिने झाले
तरी शिंदे-फडणवीसांमध्ये असलेले मतभेद काही थांबेनात असे चिन्ह आहे.एकीकडे शिंदेंकडून जाहीर झालेले निर्णय बदलले जात असतानाच आता पोलीस दलातील बदल्यांमध्येही यांचे काही एकमत होईना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नुकत्याच ‘सह्याद्री’अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीतही दोघांमध्ये मतभेद झाल्याने शेकडो पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या वेटिंगवरच राहिल्या आहेत.त्यामुळे या सरकारविरोधात पोलीस दलामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.


कोरोनामुळे रखडलेल्या पोलीस दलातील बदल्यांना अद्यापपर्यंत मुहूर्त सापडलेला नाही.जून महिन्यापर्यंत पोलीस दलातील बदल्यांना स्थगिती होती;मात्र त्यानंतर चार महिने होत आले तरी हा मुहूर्त काही निघेना अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

‘सह्याद्री’वरील बैठकीतही बदल्यांबाबत काहीच होऊ शकले नाही.
 पोलिसांच्या बदल्यांत राजकीय हितसंबंध असतात आणि हेच हितसंबंध इथेही आड येत असल्याचे समजते.निवडणूक प्रचार, शहरातील तसेच जिह्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी हवा यावरून शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समजते.

⭕सरकार कोणत्याच विषयावर निर्णय घेऊ शकत नाही –अंबादास दानवे

पोलीस दलात अनेक जण बदल्यांसाठी इच्छुक आहेत.अनेक अधिकारी, कर्मचारी यासंदर्भात मलाही भेटले आहेत.पण हे सरकार कोणत्याच विषयावर निर्णय घेऊ शकत नाही.हे सरकार अकार्यक्षम असून राज्यातील जनता असो की पोलीस कर्मचारी, या सरकारमुळे कुणीही समाधानी होऊ शकत नाही,अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

⭕इथेही निवडणुकाच डोळय़ांसमोर

राज्यात प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्यानंतर पोलीस दलाचा क्रमांक लागतो.राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्त आणि जिह्यामधील पोलीस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांना अधिक महत्त्व आहे. 

निवडणूक प्रचारामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. 
प्रचारादरम्यान सभा,रॅली,पदफेऱ्या यासाठी पोलिसांची परवानगी लागते.
 तसेच निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून प्रचारावर नियंत्रण मिळवले जाते. आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे-फडणवीसांकडून यासाठीच ताणले जात असल्याची चर्चा आहे.

बदल्यांबाबत निर्णय होत नसल्याने निरीक्षक, सहाय्यक आयुक्त तसेच इतर पदावरील पोलीस नाराज आहेत. 
मुंबईत सहाय्यक निरीक्षकापर्यंतच्या बदल्या झाल्या असल्या तरी उर्वरित राज्यात अशा बदल्या झालेल्या नाहीत.पाच पाच वर्षे अधिकारी एकाच ठिकाणी काम करीत आहेत.वैद्यकीय, कौटुंबिक कारणे देऊनही बदल्या होत नाहीत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध