Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३१ मे, २०२५

साक्री तालुक्यातील छाईल गावाच्या विनोद जाधव यांची जिल्हा परिषद रिंगणात उत्सुकता वाढवणारी एन्ट्री-काटवान परिसरात चर्चेला उधाण



सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील काटवान परिसरात कसारे गटातून छाईल गावाचे गटनेते विनोद जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे.
छाईल गावात ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले आणि अनेक वर्षांपासून सामाजिक कामात अग्रेसर असलेले विनोद जाधव हे जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा गावकऱ्यांपासून ते राजकीय वर्तुळातही जोर धरू लागली आहे.गरिब-शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या जाधव यांनी आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत,तसेच वृद्ध नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे त्यांची समाजातील ओळख एक तळमळीचा कार्यकर्ता अशी निर्माण झाली आहे.
छाईल गावातून प्रथमच कोणीतरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने गावकरी विशेष आनंद व्यक्त करत आहेत. “विनोदभाऊंच्या रूपाने आमचं गाव जिल्हा परिषदेत पोहोचेल,”अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. स्थानिक तरुण वर्ग,महिला मंडळं आणि शेतकरी गट यांचा जाधव यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान,जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे या भागातील अन्य इच्छुकांची गणितं बिघडलेली दिसत आहेत.काहीजण याला‘तगडं आव्हान’ म्हणूनही पाहत आहेत.स्वतः विनोद जाधव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,“ही मागणी जनतेची आहे.माझा उद्देश सेवा हाच आहे. काटवान परिसरासाठी काहीतरी भरीव करायचं आहे, म्हणूनच मी हा निर्णय घेतला.”
राजकीय समीकरणं कशी जुळतात आणि विनोद जाधव यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र एक गोष्ट निश्चित आहे- काटवान परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रंगतदार वातावरण निर्माण झालं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध