Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा रात्री गैरहजरपणा; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, ग्रामस्थांत तीव्र संताप


शिंदखेडा प्रतिनिधी/ तालुक्यातील बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) ऐन रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने धनराज सुका माळी (वय ५२) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर २०२५, वार शुक्रवार रोजी रात्री उशिरा धनराज माळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्या वेळी केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. ग्रामस्थ व कुटुंबीयांनी वारंवार संपर्क साधून डॉक्टरांना बोलावण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही.

केंद्रात फक्त सोनाली कोळी (परिचारिका) व किशोर कोळी (सुरक्षा रक्षक) हे दोघेच उपस्थित होते. त्यांनी उपचारासाठी मर्यादित प्रयत्न केले, पण डॉक्टर नसल्याने योग्य उपचार मिळू शकले नाहीत. अखेर धनराज माळी यांची प्रकृती झपाट्याने खालावली व त्यांनी उपचाराअभावी प्राण गमावले.

ग्रामस्थांच्या मते, त्या रात्री डॉ. निखिल देसले यांची ड्युटी असतानाही ते हजर नव्हते. स्थानिक युवकानी या घटनेची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोडके (DHO) यांना दिली. त्यांनी तत्काळ नरडाणा येथील डॉ. राजपूत यांना घटनास्थळी पाठविले, मात्र त्यांनी पोहोचल्यावर रुग्णास मृत घोषित केले.

दरम्यान, त्याच रात्री जातोडे गावातून प्रसूतीसाठी आणलेल्या एका महिला रुग्णालाही डॉक्टरांची वाट पाहत थांबावे लागले, अशी माहिती मिळाली आहे.

बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रावर बेटावद, पढावद, मुडावद, पाष्टे, अजंदे, म्हळसर, भिलाली, बाम्हणे, एकलहरे अशा जवळपास दहा गावांचा आरोग्यदृष्ट्या अवलंब आहे. रात्रीच्या वेळी डॉक्टर अनुपस्थित राहिल्याने या भागातील नागरिकांना धुळे, अंमळनेर किंवा शिरपूर येथे ४० किलोमीटरवर उपचारासाठी धाव घ्यावी लागते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, परिचारिका मनमानी वागतात, साधं ड्रेसिंगही करून देत नाहीत.” स्थानिक रुग्ण कल्याण समिती नुसती नावालाच आहे, प्रत्यक्ष कामकाजात कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही, अशीही नागरिकांची तक्रार आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे की —

रात्रीच्या ड्युटीवरील डॉक्टर नेहमीप्रमाणे केंद्रात उपस्थित राहावेत,

गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी,

आणि बेटावद आरोग्य केंद्रात २४ तास वैद्यकीय सेवा सुनिश्चित करावी.

बेटावद आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गमवावा लागला,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध