Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

सुशिलकुमार पावरा यांची अखेर ३ महिन्यानंतर तुरूंगातून सुटका; आदिवासी समाजात आनंदोत्सव!!



नंदूरबार प्रतिनिधी: आदिवासी समाजाचे प्रश्न सातत्याने मांडणारे बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांची अखेर तुरूंगातून सुटका करण्यात आली आहे.जय वळवी या आदिवासी समाजाच्या युवकाच्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ २४ सप्टेंबर २०२५ रोजी नंदूरबार शहरात आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दंगल झाल्याचा आरोप ठेवत सुशिलकुमार पावरा सह हजारों कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सुशिलकुमार पावरा यांना रात्री १२.३० वाजता प्रभूदत्तनगर लोणखेडा येथील राहत्या घरात झोपलेले असतांना बेकायदेशीर रित्या कोणतीही नोटीस न बजावता अटक केली होती. गेली ३ महिने सुशिलकुमार पावरा हे नंदूरबार जिल्हा कारागृहात आपल्या १८० सहका-यासह  न्याय बंदी  होते.सुशिलकुमार पावरा यांच्या अटकेनंतर जिल्ह्य़ात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते.
                       
माननीय न्यायालय जिल्हा व  सत्र यांनी सुशिलकुमार पावरा व इतर सहका-यांचा जामीन नामंजूर केला होता.त्याविरोधात पावरा यांनी आपले वकील भूषण महाजन यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालय मुंबई ब्रान्च औरंगाबाद येथे अपिलीय अर्ज दाखल केला होता.माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने पावरा यांचा दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी जामिन मंजूर केला व अखेर सुशिलकुमार पावरा यांची २६ डिसेंबर २०२५ रोजी नंदूरबार जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली. नंदुरबार जिल्हा कारागृहाबाहेर नाशिक, धुळे,नंदुरबार येथील बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांची पावरा यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती.पावरा कारागृहाबाहेर येताच आदिवासी शेर वापस आया असे म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोषात पावरा यांचे   स्वागत केले. विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.सुशिलकुमार पावरा हे आदिवासींचे मूलभूत हक्क व अधिकार, शिक्षण, आरोग्य,पाणी, रोजगार  ,वनहक्क अशा एकूणच आदिवासींच्या विषयांवर ठाम भूमिका मांडून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.नंदूरबार लोकसभा व विधानसभेचे उमेदवार म्हणून ही ते लोकांच्या चर्चेत राहिले. पावरा यांच्या सुटकेनंतर आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याची कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.या घटनेमुळे जिल्ह्य़ातील सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असुन आदिवासी प्रश्नांवर लक्ष वेधले जात आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध