Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

शिरपूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न नगरपालिकेकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी



शिरपूर (जि. धुळे) | शिरपूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात नगरपालिकेकडे तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे रेबीजसारख्या प्राणघातक आजारांचा धोका, अपघात तसेच मानसिक तणाव निर्माण होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सकाळी व संध्याकाळी रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या नागरिकांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत आहे.

हा प्रश्न केवळ त्रासाचा नसून थेट सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीचे निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सदर निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून चंदन आबा फाउंडेशन, गंगाई चिल्ड्रन हॉस्पिटल, नेताजी परिवार, युथ फ्रेंड सर्कल आदी सामाजिक घटक व नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह ही मागणी करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध