Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ जून, २०२६

दालमिया पॉलीप्रो कंपनीचे होणाऱ्या जल, वायू प्रदूषणविरोधात ग्रामस्थांचे निवेदन.



▶ वणी प्रतिनिधी

लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागीय प्रादेशिक अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. दालमिया पॉलीप्रो ही कंपनी गावाला अगदी लागून आहे. कंपनीत चालणाऱ्या रासायनिक प्रक्रियेचे दूषित पाणी जमिनीत मुरत असून ते लखमापूर गावाच्या सार्वजनिक विहिरीत तसेच लगतच्या शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये व शेतजमिनीत मिसळत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून शेती पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. कंपनीच्या बॉयलर आणि चिमणीची क्षमता अत्यंत कमी असून त्यातून सतत काळा धूर आणि रासायनिक केमिकल युक्त वास हवेत सोडला जातो. तसेच कंपनीच्या उत्तर व दक्षिण बाजूला सिडिक वास असलेले रॉ मटेरियल उघड्यावर टाकले जात असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गधी पसरली आहे. ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला देताना घातलेल्या नियमांचे कंपनी प्रशासनाकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.कंपनीकडून प्लास्टिक वेस्टचे कोणतेही रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले जात नाही. तसेच उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा भूगर्भातून अनधिकृतपणे बेसुमार उपसा सुरू आहे, ज्याची कोणतीही नोंद नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील भूजल पातळी खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी प्रेम गांगुर्डे, कांचन जाधव, संतोष सूर्यवंशी, प्रमोद दळवी, सोमनाथ बदादे, गोरख मोगल, तानाजी मोगल, माणिक मोगल, कारभारी खरे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध