Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

फैजपूर पत्रकार संघातर्फे विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव; महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न



फैजपूर | प्रतिनिधी

वार्ता फाउंडेशन संचलित फैजपूर पत्रकार संघातर्फे आयोजित गुणवंत नागरिक सत्कार सोहळा येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या भव्य समारंभात सामाजिक, शैक्षणिक, आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

फैजपूर शहरासह परिसरातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, वकिली, कृषी, क्रीडा, उद्योग, दिव्यांग हस्तकला अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश होता. विशेषतः आदर्श प्राचार्य, आदर्श शिक्षक, कृषिभूषण, उद्योगरत्न, युवा उद्योजक आणि वेटलिफ्टिंगमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला. यासोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांचाही पत्रकार संघातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, दिगंबर महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, नगराध्यक्षा दामिनी सराफ, उपनगराध्यक्षा निकिता कोळी, नगरसेविका अमिता चौधरी आणि सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात जनार्दन हरिजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक आणि विधायक कार्य करणे ही काळाची गरज आहे. अशा सत्कार सोहळ्यांमुळे समाजाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळते. हा सत्कार केवळ संबंधित व्यक्तीचा नसून, त्याने केलेल्या कार्याचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आहे." तसेच, वर्षभर समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांचा ६ जानेवारी रोजी सन्मान करणे हे आपले सामाजिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सत्कारमूर्तींच्या वतीने बोलताना धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुमनोहर सुरवाडे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, "समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांतून 
युवा पिढीला योग्य मार्ग सापडतो." 

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वार्ता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश सोनवणे, अध्यक्ष प्रा. राजेंद्र तायडे, उपाध्यक्ष राजू तडवी, सचिव शाकीर मलिक, सहसचिव सलीम पिंजारी मयूर मेढे यांच्यासह यावल-रावेर तालुक्यातील अनेक पत्रकारांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र राजपूत सर यांनी केले, तर यावल रावेर तालुक्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध