Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२६

व्ही.एन.नाईक महाविद्यालयात रंगला आठवणींचा मेळावा.




बापू चव्हाण नाशिक

   दिंडोरी येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.   
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी येथील प्रसिद्ध उद्योजक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अजित पटवा यांच्यासह माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष कैलास गायकवाड,सचिव गोपाळ घुगे उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेच्या पूजनाने तसेच क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.या प्रसंगी महाविद्यालयाच्या 'मार्कंडेय' या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
      यावेळी सर्व माजी विध्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमामध्ये कैलास चौधरी,अनिरुद्ध गायकवाड, चेतन चौधरी,चेतन सोनवणे,चेतन पारधी,विक्रम नाठे,पुंडलिक शिरसाठ,चैताली शार्दूल,दामिनी गांगुर्डे,रामेश्वर पेलमहाले या माजी विद्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालय आणि शिक्षकांच्या प्रती ऋण व्यक्त केले. त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या आणि शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम भवर,राज्यशास्त्र विभागप्रमुख आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रल्हाद दुधाने,एन.एस. विभागप्रमुख प्रा.वैशाली गांगुर्डे यांनी आपल्या विभागांच्यावतीने माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.डॉ.आनंद सानप यांनी महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाच्या दृष्टिकोनातून माजी विद्यार्थी संघाच्या योगदानाचे महत्त्व पटवून दिले.महाविद्यालयाचे उपप्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुनील उगले यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मंचचे अध्यक्ष कैलास गायकवाड,सचिव गोपाळ घुगे यांनी माजी विद्यार्थी मंचच्या कार्याबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या पंचवीस वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला.त्यांनी महाविद्यालयाची सुरुवात किती प्रतिकूल परिस्थितीतून झाली ते सांगून २५ वर्षात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला याची माहिती दिली.तसेच रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. 
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तेजस्विता मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप गांगुर्डे यांनी केले.तर आभार प्रा. योगिता ढाकणे यांनी मानले. मेळाव्याला माजी विद्यार्थी,सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध