Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १३ मे, २०२६

उष्णतेच्या तीव्र लाटेत महावितरणची ७ तासांची वीज कपात; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप


🟨 अमळनेर प्रतिनिधी : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून जळगाव जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात तापमान ४० ते ४५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना महावितरण विभागाकडून देखभाल-दुरुस्तीच्या (Maintenance) नावाखाली तब्बल ७ तास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

🟥 विशेष म्हणजे, अमळनेर तालुक्यात अलीकडेच उष्माघातामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महावितरण विभागाकडून दीर्घकाळ वीज बंद ठेवली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

🟩 कळंबू मुडी, मांडळ आणि बोदर्ड या गावांची गावठाण लाईन देखील बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून पंखे, कूलर, मोटारी तसेच दैनंदिन वापरातील उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.

⬛ ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महावितरणकडून पूर्वनियोजित कामांसाठी ३ ते ४ तास वीज बंद राहणार असल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात ७ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वाढत्या तापमानात इतक्या दीर्घकाळ वीज कपात करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

🟥 ग्रामीण भागात आधीच उष्णतेमुळे परिस्थिती गंभीर बनली असताना वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “देखभाल-दुरुस्ती”च्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची प्रतिक्रिया सामाजिक स्तरातून उमटत आहे.


🟨 नागरिकांनी महावितरण प्रशासनाने कामांचे योग्य नियोजन करून कमी वेळेत देखभाल कामे पूर्ण करावीत, उष्णतेच्या काळात दीर्घ वीज कपात टाळावी आणि गावठाण भागातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध