Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ मे, २०२६

महावितरणच्या मनमानीला ग्राहक आयोगाचा चाप – विनासूचना मीटर बदल प्रकरणात कंपनी दोषी



सोनगीर प्रतिनिधी :- महावितरण कडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामात मोठा गैरप्रकार समोर आला असून, ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलल्याप्रकरणी कंपनीला ग्राहक आयोगाने जोरदार झटका दिला आहे.
स्मार्ट मीटर बसविताना संबंधित ग्राहकांची पूर्वसंमती घेणे, तसेच जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग घेणे बंधनकारक असतानाही धुळे जिल्ह्यात महावितरणकडून नियमांचा सर्रास भंग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मनमानी कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, सोनगीर येथील रहिवासी रुपेश मराठे यांच्या घरी त्यांच्या अनुपस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलला. इतकेच नव्हे तर जुन्या मीटरचे अंतिम रीडिंगही न घेता ही कारवाई करण्यात आली. या प्रकाराबाबत त्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली; मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी ग्राहक आयोगाचे दार ठोठावले. ग्राहक आयोगात सुनावणीदरम्यान महावितरणकडून कोणीही हजर न राहिल्याने प्रकरण एकतर्फी चालवण्यात आले. आयोगाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, नियमांचे उल्लंघन करून विनासूचना मीटर बदलणे ही गंभीर सेवेतील त्रुटी असून ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारी कृती आहे.

या प्रकरणात आयोगाने महावितरणला दोषी ठरवत तक्रारदाराला ८ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या रकमे मध्ये आर्थिक, मानसिक त्रास तसेच अर्जखर्चाचा समावेश आहे. तसेच ४५ दिवसांच्या आत रक्कम न दिल्यास ६ टक्के व्याजासह देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या या निर्णयामुळे महावितरणच्या मनमानी कारभारावर कडक ताशेरे ओढले गेले असून, सर्वसामान्य ग्राहकांसाठी हा एक मोठा दिलासादायक निर्णय मानला जात आहे. भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर लगाम बसेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध