Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० मे, २०२६

दिंडोरी पिंपळगाव राज्यमार्ग रस्त्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या अधिग्रहणाची मागणी; महसूल मंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन





बापू चव्हाण दिंडोरी

        पिंपळगाव मार्केट ते चिंचखेड, जोपुळ,धामणवाडी,लोखंडेवाडी व पालखेड मार्गे दिंडोरी जाणाऱ्या राज्य क्रमांक २९ रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे उपस्थितीत बैठक होत भू संपादन बाबत कार्यवाही करण्याच्या सुचना बावनकुळे यांनी दिल्या आहे.राज्यस्व अभियाना दरम्यान राज्य मार्ग २९ चे बाधित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी डांगले व इतर सदस्यांनी महसूल मंत्री यांना निवेदन सादर केले होते.
       या निवेदनाची दखल घेत मंत्रालयात बाधित शेतकरी कृती समितीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. यावेळी समितीच्या सदस्यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की,या रस्त्यामुळे बाधित होणारे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या जमिनीचे योग्य अधिग्रहण करूनच रस्त्याचे काम करण्यात यावे. अन्यथा शासनाला जमीन देणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला.
बैठकीदरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून या रस्त्याबाबत यापूर्वी अधिग्रहण झाले आहे का याची माहिती घेतली. त्यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या बाधित शेतकऱ्यांचे यापूर्वी कधीही अधिग्रहण झाले नसल्याचे स्पष्ट केले.
         यानंतर बावनकुळे यांनी शेतकरी प्रतिनिधींना आश्वासन देताना सांगितले की,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागा मागणीची फाईल प्राप्त होताच अवघ्या चार दिवसांत मंजुरी प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि पंधरा दिवसांच्या आत बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल.त्यानंतर कृती समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांचीही भेट घेतली. बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत अधिग्रहणाची फाईल तातडीने तयार करून वरिष्ठांकडे पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 
       याचवेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राहुल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्य क्रमांक २९ रस्त्याचे अधिग्रहण तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.
या बैठकीनंतर बाधित शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून,शासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 जिल्हाधिकारी यांचेकडून रस्त्याची पाहणी

       सदर बैठकीनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधतं शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचे दृष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध