Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

हैद्राबाद मूक्ती दिनानिमीत्त आलियाबाद पूलाचे पूजन.




हैद्राबाद मूक्ती दिनानिमीत्त नळदुर्ग नगरीचे नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या वतीने नळदुर्ग येथील एैत्याहासिक आलियाबाद पुलाच्या पुजनाचा कार्यक्रम आयोजीत केलेला होता.. या पूलाचे मूक्ती संग्रामाच्या इतिहासात खूप मोठे महत्व आहे म्हणून गेली २० वर्षापासून अहंकारी या कार्यक्रमाचे आयोजन करतात..
याप्रसंगी नगरसेवक बसवराज धरणे.. जेष्ठ पत्रकार विलास येडगे.. पत्रकार सूहास येडगे..पत्रकार शिवाजी नाईक..भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके.. पत्रकार भगवंत सूरवसे..पत्रकार मित्र अमर भाळे..राजाभाऊ महाबोले.. बंडाप्पा कसेकर.. महेंद्र डूकरे..उमेश जाधव..भाजयुमोचे शहर अध्यक्ष श्रमीक पोतदार.. उमेश नाईक..भिमाशंकर बताले..मयूर महाबोले उपस्थित होते...

                                                                                                                    (प्रतिनिधी विशाल डूकरे)वृत्त क्रमांक 635 राज्यातील पहिली लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मिळालेल्या
मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेचा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव


मराठवाडा मुक्तीसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळयात मौलाना अबुल कलाम आझाद ही शाळा जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा झाल्याबददल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला. 

शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे  व तब्बल 5 लाख 17 हजार 68 इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती  भाषेतही प्रकाशित होते.

जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते.यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी  असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.
या सन्मानाबददल या शाळेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



( प्रतिनिधी विशाल डुकरे ):जनतेला केंद्रस्थानी मानून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने
मिळून जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत



उस्मानाबाद,  जिल्ह्याचे पालकमंत्री  व खासदार ओमराजे निंबाळकर आणि अन्य पदाधिकारी, अधिकारी यांच्या साथीने जिल्ह्यात विविध तालुकास्तरावर जनता दरबार आयोजित केले जात आहेत, जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे, जनतेला केंद्रस्थानी मानून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून जनतेचे प्रश्न सोडविणे महत्वाचे आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 71 व्या  वर्धापनादिनाच्या मुख्य  ध्वजारोहण सोहळयाप्रसंगी केले. 
 
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, प्र.अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, कार्यकारी अभियंता अनिल सगर, जिल्हा पुरवठा अधिकारी  डॉ. चारुशिला देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.प्रताप काळे, महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, उप अभियंता श्री. गपाट, कनिष्ठ अभियंता श्री. मुळे, उप वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.पवार, तहसिलदार अभय म्हस्के, राजकुमार माने, श्री. तेलूरकर, श्री.पाचभाई, जिल्हा क्रीडा अधिकारी  भाग्यश्री बिले, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे श्री.कोंडेकर,श्री. रुकमे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे,नायब तहसिलदार संतोष पाटील, अनिल खोचरे, कैलास पाटील,  विविध विभागांचे विभाग प्रमुख, पत्रकार, विद्यार्थी व अन्य मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आतापर्यंत विविध विकासकामांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिला असून  यापुढेही शासन आणि प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. 

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत बोलताना पालकमंत्री श्री.सावंत म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प लिंक-5 चे काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पास  मा. राज्यपाल महोदयांच्या निधी सूत्राबाहेर निधी प्राप्त होत असून सन 2017-18 मध्ये रु.237 कोटी व सन 2018-19 मध्ये रु.523 कोटी असे एकूण रु. 760 कोटी निधी प्राप्त असून सन 2019-20 साठी रु.500 कोटी निधीची तरतूद मंजूर असून  प्रकल्पाचे काम  प्रगतीपथावर आहे. 
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत वॉटर ग्रीड प्रकल्पाचा विशेष उल्लेख करताना म्हणाले की, शासनाने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कामांसाठी रू.3 हजार 122 कोटीच्या निविदा मागविल्या आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य व दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा आदी कामांसाठी 3 हजार 122 कोटींच्या पहिल्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत वॉटर ग्रीड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे इस्त्रायल शासनाच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस कंपनी सोबत करार करण्यात आला असून या करारानुसार सहा टप्प्यात विविध अहवाल व 10 प्राथमिक संकलन अहवाल असे सर्व अहवाल फेब्रुवारी 2020 पर्यंत सादर करण्यात येणार आहेत. या कार्यवाही अंतर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पहिला व दुसरा प्राथमिक संकलन अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 37.92 किलोमीटर एमएस पाईप तर 665.75 किलोमीटर डीआय पाईप लाईन अशी एकूण 703.67 किलोमीटर पाईप लाईन प्रस्तावित आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार 409.57 कोटी अशी एकूण 3 हजार 122 कोटी 18 लाख किंमत प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी हायब्रिड ॲन्युटी मॉडेलवर निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 
 
नुकताच शासनाने विदर्भ-मराठवाड्यातील सावकारांनी परवाना क्षेत्राबाहेर दिलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेतला. याबाबत आपल्या भाषणात बोलताना प्रा.डॉ.सावंत म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्य शासनाने एप्रिल 2015 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेली कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 19 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या मंजुरीनुसार 31 मार्च 2018 पर्यंत 46 हजार 735 शेतकऱ्यांची 55 कोटी 96 लाख 65 हजार रुपयांची मुद्दल आणि 10 कोटी 59 लाख 73 हजार रुपयांचे व्याज असे एकूण 66 कोटी 56 लाख 38 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जापोटी 1 हजार 393 सावकारांना वितरित करण्यात आली आहे.

शेवटी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झालेले  स्वातंत्र्यसैनिक  आयुष्यभर  क्रियाशील  राहिले  आणि आजही  क्रियाशील आहेत,अशा या महान स्वातंत्र्यसैनिकांनी केवळ स्वातंत्र्य  मिळविणे  एवढेच ध्येय  समोर  न ठेवता समग्र  विकासाचा  ध्यास  धरला होता, तो ध्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.त्यांचा आशिर्वाद सदैव आपल्या सोबत आहेत, असे सांगून पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी उपस्थित सर्वांना आवाहन केले की, या ऐतिहासिक दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया…..शासन, प्रशासन आणि सर्व नागरिक मिळून आपल्या जिल्हयाला आकांक्षित जिल्हयांच्या यादीतून लवकरात लवकर बाहेर काढू  आणि या जिल्हयाला विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देवू या ! तुम्ही आम्ही आपण सर्व जबाबदार नागरिक म्हणून कायदा व सुव्यवस्था व सामाजिक शिस्तीचे पाईक होवून जिल्हयाच्या विकासासाठी एकत्रित येऊन चांगले काम करु या !

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांचे आगमन होताच सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले,पोलीस विभागातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मराठवाडा मुक्ती संग्रामातील शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
या सोहळयाच्या निमित्ताने जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मिळविलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेचा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला. या संस्थेतील इ.7 वी ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे  सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्हयातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी,पत्रकार यांची सदिच्छा भेट घेतली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक आणि शिक्षक हनुमंत पडवळ यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध