Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

निरागस गवा आणि 'नरभक्षक' बिबट्या कशी असते ना विचारसरणी.. वस्तीत शिरलेल्या गव्याचा मृत्यू




निरागस गवा आणि 'नरभक्षक' बिबट्या 
कशी असते ना विचारसरणी.. वस्तीत शिरलेल्या गव्याचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला.. त्याचा जीव घेतला म्हणून अनेकांनी खंत व्यक्त केली.त्याला श्रद्धांजली वाहिली.आज सोलापूरमध्ये संध्याकाळी बिबट्या मारला गेला तर लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. नरभक्षक ठार झाल्याचे जाहीर केले. मनोमन बरं झालं गेला एकदाचा असा विचार अनेकांनी केला.

दोन्ही घटना वन्यप्राणी मनुष्य वस्तीत शिरल्याच्याच...पण पहिल्या घटनेत गव्याने कोणाला काही इजा पोहोचवली नाही, धडक मारली नाही किंवा शिंगावर उचलले नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो सैरावैरा धावला.. वेगवेगळ्या ठिकाणी धडकला आणि खचाखच भरलेल्या बघ्यांच्या गर्दीत प्राण सोडला. त्यामुळे तो निरागस ठरला. 

आजच्या घटनेतील बिबट्याने स्वसंरक्षणार्थ लोकांवर हल्ले केले. गेल्या काही दिवसात बीड, सोलापूर, नगर वेगवेगळ्या भागात वाटेत आलेल्या लोकांचे बळी घेतले. त्यामुळे तो नरभक्षक ठरला. दिसला तर त्याला ठार मारा असे अलिखित आदेश निघाले. आज त्याला ठार करण्यात यश आले. नरभक्षक बिबटय़ाचा अंत असे मेसेज तासाभरात व्हायरल झाले.

बिबट्या निरागस होता किंवा नाही. त्याला मारणे हा एकमेव पर्याय होता का.. यावर आता आठवडाभर चर्चा रंगातील. 
पण सहज मनात आलेला विचार जर पुण्यात आलेल्या गव्याने आठ दहा लोकांना जखमी केले असते, एखाद दुसर्‍याचा बळी घेतला असता तर निरागस गवा अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली असती का हो.. किंवा लोकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली असती का?
पिसाळलेल्या गव्याने पुणेकरांचा जीव घेतला असे मेसेज फिरले असते.
कशी असते ही विचारसरणी.. . वन्यप्राण्यांनी माणसाच्या सोयीने वागले पाहिजे असा अट्टाहास काय उपयोगाचा..
सुभाष पाटील 
(हरीतसेना सदस्य)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध