Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी बलात्कारासाठी महिलांनाच जबाबदार धरले आहे.



दिल्ली : मुलींकडून दाखल होणाऱ्या बलात्काराच्या तक्रारी या प्रामुख्याने ब्रेक-अप झाल्यानंतर दाखल होतात, असे वादग्रस्त विधान महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच केले आहे. बलात्कार होण्यास महिलाच जबाबदार असतात, असे तारेही अध्यक्षांनी तोडले आहेत. त्यांच्या या विधानावरुन मोठा गदारोळ उडाला आहे. 

महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्याचे काम महिला आयोग करतो. आता महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच महिलांच्या विरोधात भूमिका घेतल्याने दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, महिलांवरील अत्याचारांविरोधात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका घेतली आहे. ही वादग्रस्त भूमिका घेणाऱ्या छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक या टीकेच्या धनी बनल्या आहेत. त्यांच्यावर आता जोरदार टीका होत आहे. 

नायक यांनी म्हटले आहे की, बहुतांश प्रकरणामध्ये मुली या संमतीने संबंध ठेवतात अथना 'लिव्ह-इन'मध्ये राहतात. परंतु, नंतर पटले नाही म्हणून मुली वेगळ्या होतात. त्यानंतर त्या बलात्काराची तक्रार दाखल करतात. जास्तीतजास्त कौटुंबिक तंटे सोडवण्यासाठी आमचा आयोग काम करीत आहे. यासाठी अनेक वेळा आम्ही महिला आणि पुरुषांना दटावतो आणि त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशन करण्याची आमची पद्धची अशीच असते. 

विवाहित पुरुषाने एखाद्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवले तर, तो खोटे बोलत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्या मुलीची आहे. तो पुरुष पुढे आयुष्यात तिच्याबरोबर राहणार आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारीही मुलीची आहे. असे घडले नाही तर मग मुली अखेरीस पोलिसांकडे येऊन तक्रार देतात, असे नायक यांनी म्हटले आहे. 

तुम्ही फिल्मी रोमान्स पाहून हुरळून जाऊ नका. तुम्ही अल्पवयीन असाल तर अशा सापळ्यात अडकू नका. तुमचे नातेवाईक, मित्र आणि तुमचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकते. आता 18 वर्षे पूर्ण झाली की लग्न करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. अशा दांपत्यांना मुले झाल्यानंतर ती एकमेकांसोबत जगू शकत नाहीत, असे नायक यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध