Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जुलै, २०२२

पांढरेवाडीचे ग्रामस्थ घेणार सामूहिक जलसमाधी...






परंडा (राहूल शिंदे) दि.१८ तालुक्यातील पांढरेवाडी येथील निम्नखैरी प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या पांढरेवाडी पूर्व व पश्चिम गावांची रस्त्यांची समस्या खूपच बिकट आहे.यासाठी गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व पाठपुरावा करून देखील हाती फक्त आश्वासना शिवाय काहीच आले नाही.याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या विविध नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते, पुनर्वसन मधील जागेत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आरोग्य केंद्र,रस्ते,विद्युतीकरण,प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,मंदीर,इतर धार्मिक स्थळे,स्मशानभूमी,पोस्ट ऑफिस इमारत , रास्त भाव धान्ये दुकान व बियाणे, खते साठवण गोदामे इ.बाबींचे काम पूर्ण झाल्यानंतरच स्थलांतर करता येते असे कायदेशीर नियम व अटी असतानाही शासनामार्फत पांढरेवाडी गावचे पूर्व व पश्चिम बाजूचे पुनर्वसन मधील जागेत वरील नमूद विविध प्रकारचे नागरी सोयी सुविधा अद्यापपर्यंत राबविल्या नाहीत व तश्या प्रकारची कामेही केलेली नाहीत.शासनाने सन २०१२मध्येच आम्हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे वरील कुठल्याही प्रकारचे नागरी सोयी सुविधा नसताना प्लॉट वाटप करून स्थलांतर केले.शासनाने मे २०१३ मध्ये आम्हा अर्जदार प्रकल्पग्रस्त शेतकरी व पांढरेवाडी प्रकल्पाची धार अडविण्यात आली.त्यामुळे सन २०१३ पासून पावसाळ्यात पांढरेवाडी गावात व आसपास आमच्या मालकीचे संपादीत जमीन क्षेत्रामध्ये पाणी जमा झाल्याने प्रकल्पामध्ये १००% पाणी साठ्यांची वाढ झाली.त्यामुळे पांढरेवाडी पूर्व व पश्चिम गावाचा संपर्क तुटला.तब्बल आठ ते नऊ वर्षांपासून ग्रामस्थांना रस्ते , पाणी, वीज , या मूलभूत गरजा व सुविधांसह शासनाची कोणतीही सुविधा अद्यापपर्यंत मिळालेली नाही.गावाला रस्ता करण्याच्या मागणीसाठी या अगोदर ग्रामस्थांनी निम्नखैरी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते, तरीही शासकीय यंत्रणेने पोलीस संरक्षणात प्रकल्पाचे काम पुर्ण केले.वास्तविक पाहता प्रकल्प उभारण्यासाठी पांढरेवाडी येथील संपूर्ण घरे व जमिनी संपादीत केलेल्या गावाचे पुनर्वसन करतांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते.परंतू पांढरेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद, उपविभागीय अधिकारी भूम,तहसीलदार परंडा ,कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग उस्मानाबाद , मा.अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग उस्मानाबाद , मा.कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी उस्मानाबाद यांना वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊनही रस्ते, विज , पिण्याचे पाणी व इतर उपाययोजना करण्याबाबत विनंती करूनही अद्यापपर्यंत शासन स्तरावर कसल्याही प्रकारची कार्यवाही आजतगायतपर्यंत केलेली नाही.

तसेच दि.२६/९/२०१६ रोजी विजय शिवतारे जलसंपदामंत्री यांनी निवेदन देऊन विनंती केली होती,तरीही शासन स्तरावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही.आम्हा ग्रामस्थांचे सध्या रस्ता,वीज व पाण्याची सोय नसल्यामुळे आमचे जगणे अशक्यप्राय झालेले आहे.तसेच मौजे लंगोटवाडी ते पांढरेवाडी पुनर्वसन पश्चिम बाजू साठी वामनभाऊ गहिनीनाथ गडाचे पालखीसाठी रस्ता जोडून देणेबाबत अर्ज व विनंती करूनही रस्ता अद्यापपर्यंत जोडण्यात आलेला नाही.मौजे पांढरेवाडी पश्चिम बाजूकडून ते शेळगाव गावाकडे रस्त्याचे कामही अद्यापपर्यंत केलेले नाही.

दि.१७/९/२०१७ रोजी निम्नखैरी बृहत ल.पा तलावांमध्ये दि.१७/९/२०१७ रोजी सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुशंगाने कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग उस्मानाबाद, उपविभागीय अभियंता कुंडलिका प्रकल्प उपविभाग परंडा,शाखा अभियंता कुंडलिका प्रकल्प उपविभाग परंडा, तहसीलदार परंडा, मंडळअधिकारी आनाळा, तलाठी चिंचपुर बु.हे पांढरेवाडी पश्चिम येथे उपस्थितीत होते.जमलेल्या ग्रामस्थांना जून २०१८ पर्यंत संपूर्ण काम पुर्ण करून देऊ.तसेच पांढरेवाडी पश्चिम ते शेळगाव रस्ता दिलेल्या वेळेत जबाबदारी पूर्ण न केल्यास खालील संबंधित कार्यालय प्रमुख जबाबदार रहातील.हे सर्व ग्रामस्थांनी व उपस्थितीत अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.

व त्यानुसार दि.१७/९/२०१७ रोजीचा जलसमाधी घेण्याचे रद्द केले होते.सध्या वृष्टीमुळे पांढरेवाडी पश्चिम बाजूकडील पुनर्वसन मधील प्रकल्पग्रस्त अर्जदार यांना रस्ता उपलब्ध नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होत आहे.तसेच रस्ता नसल्यामुळे आजारी रुग्ण, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला,दळणवळण अथवा वाहतुकीचे कुठलेही पर्याय उपलब्ध नाहीत.मागील ७५ वर्षांपासून पांढरेवाडी पश्चिम गावाला अद्यापही बसची सोय नाही,तसेच विजेची सोय अद्यापपर्यंत पश्चिम पुनर्वसन मधील गावठाणात राबविली नाही,तसेच पाणी पुरवठय़ाची सोयही कसल्याही प्रकारची करण्यात आलेली नाही.आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी हे वेळोवेळी शासन स्तरावर अर्ज व निवेदन देऊनही अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची कामे राबवली नाहीत.त्यामुळे आम्ही फार निराश झालेलो आहोत.रस्त्याच्या अभावी आयुष्यभर मरण यातना सहन करण्यापेक्षा नाईलाजास्तव दि.५ऑगस्ट २०२२ रोजी तलावामध्ये रामजीबाबा मंदीर पांढरेवाडी पश्चिम येथे सामुदायिक जलसमाधी घेणार आहोत, यांच्या परिणामास प्रशासकीय तसेच शासकीय यंत्रणा जबाबदार राहील.सदर जबाबदार अधिकाऱ्यांवर निर्दोष मनुष्यवधाचे गुन्हे दखल करावेत. याची नोंद घ्यावी.जर यातून काही मार्ग काढण्याची इच्छा असेल तर कृपया कोणत्याही प्रकारचे तोंडी किंवा लेखी आश्वासन न देता दि.१ ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी.अशी आम्हा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपणांस शेवटची नम्र विनंती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध