Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

कत्तलीसाठी चोरीची गुरे पळविणाऱ्या वाहनावर चोरट्यांनी केला भगव्या झेंड्याचा वापर शेतकऱ्यांची गुरे चोरणारे कुरेशी बंधू अखेर जेरबंद -अमळनेर शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक



अमळनेर - प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणाहून कत्तलीसाठी शेतकऱ्यांच्या गुरांची चोरी करणाऱ्या आणि आठ महिन्यांपासून किमान २५ गुन्ह्यात वॉन्टेड असणाऱ्या मूळच्या अमळनेरच्या दोघा कुरेशी बंधूंच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून एकाला मालेगाव येथून तर दुसऱ्याला अमळनेर बसस्थानकावर बेड्या ठोकल्या यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

अमळनेर शहरात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जळगाव जिल्ह्यात अमळनेर,चाळीसगाव,पारोळा,चोपडा,धरणगाव आदी ठिकाणी आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी आणून गुरे चोरणारे मुख्य सूत्रधार रशीद शफी कुरेशी व शकील शफी कुरेशी (मूळ रा.कसाली मोहल्ला अमळनेर,हमु मालेगाव) हे अमळनेरच्या चार गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होते.ते फरार असल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट काढले होते.परराज्यात ही चोरीचा गुन्हा असलेला रशीद कुरेशी हा मालेगावला स्थायिक झाला होता.

रशीद याने मालेगावला पाचव्यांदा विवाह केला असून त्याने नवा संसार थाटल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब सहा पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील,मिलिंद भामरे,सूर्यकांत साळुंखे याना मालेगाव येथे पाठवले. रशीद हा गुलाबबाबा दर्गा माळदे येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.मात्र शकील सापडला नाही.

रशीदला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने शकील २२ रोजी‌ चोपडा येथून बसने मालेगाव येणार असल्याची माहिती देताच पोलिसांनी अमळनेर बसस्थानकावर सापळा रचून शकील याला देखील बस मधून ताब्यात घेतले. दोघांना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भगवा झेंडा असलेल्या गाडीचा वापर

रशीद आणि शकील गुन्ह्यांमधील मास्टर माईड होते.कुठून कोणती गुरे कशी उचलायची याच्यावर ते पाळत ठेवत असत आणि वाहतूक करताना संशय येऊन नये म्हणून हिंदू व्यक्तीची भगवा झेंडा असलेली गाडी वापरत असत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध