Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

कै.गंगाधर कल्हापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली



सुमारे 36 वर्षांपूर्वीचा प्रसंग तारीख होती 8 डिसेंबर 1986 त्यावेळी माझे वय 14 वर्षाचे होते. नुकतेच छोटे छोटे कार्यक्रम सुरू केलेले होते.त्यामध्येच महाराष्ट्र शासनातर्फे सहावा विविध कला महोत्सव गडचिरोली, चंद्रपूर ,आणि वर्धा या ठिकाणी होणार होता. महाराष्ट्र शासनातर्फे इतकी मोठी संधी मला मिळाली होती परंतु केवळ पैशामुळे हातबल होतो.आमचे तत्कालीन राहुरीचे आमदार श्री प्रसाद तनपुरे साहेब हे मला तर वेळोवेळी मदत करतच होते परंतु त्यांना मी सांगितले की गडचिरोली येथे कार्यक्रमाला जायचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले अजिबात जायचे नाही कारण तेथे नक्षलवाद्यांचा सुळसुळाट चालू आहे.

त्यामुळे तत्कालीन कृषिमंत्री  शंकरराव कोल्हे साहेब यांचाही गडचिरोली दौरा रद्द करण्यात आला होता.त्यामुळे बापूसाहेब तनपुरे यांनी सांगितले की विजू तू कुठेही जायचे नाही. मी त्यांना म्हटले सुद्धा की नक्षलवादी मला कसे काय त्रास देतील, तेव्हा त्यांनी सांगितले नाही जायचे म्हणजे नाही जायचे.मग मी काही लोकांकडे मदत मागायला लागलो कारण मला काहीही करून ही पहिली संधी सोडायची नव्हती.तेव्हा पैगंबरवाशी शब्बीरशेख देशमुख, दशरथ साळवे,बबनराव गाडेकर, बाबुराव तांबोळी यांनी त्यांच्या परीने आर्थिक मदत दिली.पण तरीसुद्धा त्यामध्ये खर्च भागणार नव्हता कारण भाडोत्री गाडी घेऊन जायची सर्व कलाकार न्यायचे आणि अनोळख्या ठिकाणी जायचे.पैशाची व्यवस्था कशी करावी या विवंचनेत असताना अचानक मला समजले की अमुक अमुक व्यक्ती व्याजाने पैसे देते.त्या व्यक्तीला मी जाऊन भेटलो त्यांनी सांगितले कोणीतरी जामीनदार घेऊन ये.मला कोणीही सापडेना कारण लहान मुलावर भरोसा ठेवणार कोण. मग त्या रात्री अचानक सायंकाळी सात वाजता राहुरीच्या शनी चौकामध्ये त्या व्यक्तीबरोबर बोलत असताना काही गंगाधर कल्हापुरे तेथे आले मग मी त्या व्यक्तीला सांगितले गंगाधर कल्हापुरे यांनी सांगितले तर पैसे द्याल का. तो व्यक्ती लगेच म्हणाला गंगाधर काल्हापुरे हे शिवसेना तालुकाप्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी जर सांगितले तर शून्य मिनिटात पैसे देतो.तेव्हा मी गंगाधर कल्हापुरे यांना सांगितले अशी अशी अडचण आहे तेव्हा त्यांनी सांगितले की पैसे द्यायला काही हरकत नाही. आणि त्या व्यक्तीने मला पैसे दिले आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या सोहळ्याला मी जाऊ शकलो. तेव्हा राहुरीतील एकही जी ड्रायव्हर गडचिरोलीला येण्यास तयार नव्हता त्यावेळी आमची चुलत बंधू रावसाहेब राधुजी तनपुरे हे स्वतः गाडी चालवत माझ्याबरोबर आले आणि मग तो कार्यक्रम यथासांग पार पडला  आज गंगाधर कल्हापुरे आपल्यामध्ये नाहीत ही बातमी मला आत्ता समजली तेव्हा मला धक्का बसला.मला घडवणारे 128 लोक आहेत त्यापैकी काही गंगाधर कल्हापुरे हे एक आहेत. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबीयांवर हा झालेला आघात सहन करण्याची शक्ती त्यांना देव. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. 

शिवशाहीर डॉ विजय तनपुरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध