Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३
रयतचे कर्मवीर...
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई व पत्नी चे नाव लक्ष्मीबाई होते.
भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला. त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने १९५९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.
भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’, ‘श्रम करा व शिका’ हा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.कर्मवीर भाऊराव पाटील हे जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते.
सातारा जिल्ह्यातील काले या गावी दिनांक ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
२५फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस असे नामकरण केले गेले.१६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
भाऊरावांनी महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल सुरू केले.इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले.
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. हि रयत शिक्षण संस्थेचे उद्देश आहे.या कार्यात भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची मोलाची साथ मिळाली.कर्मवीरांनी ९ मे १९५९ रोजी जगाचा निरोप घेतला.
लेखन व संकलन
शिंदे बी. एस.
सहशिक्षक श्री.नागेश विद्यालय जामखेड.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा