Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

आदिवासी पारधी समाज शिरपूर तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न...!



शिरपूर प्रतिनिधी :-आदिवासी पारधी समाज शिरपूर तर्फे शिरपूर तालुक्यातील पारधी समाजातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा पारधी समाज सभागृह, शिरपूर येथे घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेला शिरपूर तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा परीक्षेसाठी गणित, मराठी, बुद्धिमत्ता, हिंदी व जनरल नॉलेज वरील प्रश्न विचारण्यात आलेले होते. 

सराव स्पर्धा परीक्षा घेण्याचा उद्देश समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व्हावे, अभ्यासाची आवड निर्माण व्हावी व भविष्यात त्यांना वेगवेगळ्या पदासाठी संधी मिळाव्यात हा होता. 
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी निवडण्यात आले.  त्याचबरोबर उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी दहा विद्यार्थी निवडण्यात आले. सदर परीक्षेत प्रथम क्रमांक जयेश तुकाराम पवार, द्वितीय क्रमांक प्रमोद विक्रम पारधी व तृतीय क्रमांक रोहित नारायण चव्हाण यांनी मिळविला. प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.  

या बक्षीस वितरण कार्यक्रमाची सुरुवात श्री समशेर सिंग पारधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमसिंह दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सोनवणे, गणेश साळुंके व दिगंबर शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी भीमसिंह दाभाडे यांनी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने जागरूक राहून समाजाचा व स्वतःचा विकास कसा करावा हे सांगितले. श्रीराम सोनवणे यांनी समाज उपयोगी योजनांची माहिती सांगून सर्वांना याच्यात कशाप्रकारे सामील करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. गणेश साळुंके यांनी स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या अडचणी आपण कशा सोडवाव्यात? त्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजे ? अभ्यास करण्याची पद्धत कोणती ? एकत्रितपणे अभ्यास करण्याचे फायदे काय होतात ? ग्रुप चर्चा केल्यामुळे काय फायदा होतो ? याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दिगंबर शिंदे यांनी संगणक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे काम केले पाहिजे ? त्यात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यायाविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी समाजातील मुला-मुलींसाठी होत असलेल्या या कार्यक्रमांसाठी आयोजकांचे आभार मानले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर शिंदे यांनी केले. 

या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना अमोल पवार, निलेश पारधी,  आकाश पारधी, प्रवीण  व विशाल शिंदे यांची होती. या सर्व टीमने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे काम व त्यांना यशा प्रत नेण्यासाठी काय करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. वरील सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या या युवकांचा भविष्यात वेगवेगळ्या प्रकारचे समाजपयोगी कार्यक्रम घेण्याचा विचार केलेला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध