Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ जून, २०२५

शालार्थी आयडी घोटाळ्याचा अखेर पर्दाफाश; शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील बोगस शिक्षकांचे एप्रिलपासून वेतन बंद! दै.तरुण गर्जना ' बातमीचा इफेक्ट


 
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि शिरपूर,शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक भरती करण्यात आल्याचे प्रकरण ' दैनिक तरुण गर्जना ' मधून सविस्तर पणे प्रसिद्ध करून त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते.अखेर या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील धुळे,शिरपूर,शिंदखेडा तालुक्यातील बोगस शिक्षक भरती झाल्याची बाब अधोरेखित झाली असून या सर्व ३७ शिक्षकांचे वेतन एप्रिल २०२५ पासून बंद करण्यात यावे असा आदेश जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुवर यांनी काढला आहे.या शासकीय निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या तरुण गर्जना वृत्तपत्रास देखील धन्यवाद दिले आहेत.वेतन बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी या शालार्थ घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी व त्यात सामील अन्य अधिकारी, कर्मचारी,
जिह्यातील संस्था चालक यांच्यावर आरोप निश्चित करून पुढील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी केली आहे.
   
नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.शासनाने याबाबत नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.भ्रष्ट मार्गाने तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती करण्यास सहकार्याचा हातभार लावला.त्यामुळे शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात अनेक शाळेत बोगस शिक्षक नियुक्ती करण्यात आली.त्यातील काही शिक्षक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत असा आक्षेप घेतला गेला.मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.या दोन्ही तालुक्यात शिक्षण क्षेत्रात काही स्वयं घोषित शिक्षण संस्था चालक निर्माण झाले असून त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या शाळेत पात्रता नसताना बोगस लोकांना शिक्षक म्हणून मान्यता दिली.त्याचा परिणाम या पवित्र क्षेत्रात होताना दिसतो.ज्यांनी परिश्रम घेवून शिक्षण घेतले.त्यांची या क्षेत्रात शिक्षक म्हणून पात्रता आहे.अशा उमेदवारांना वंचित ठेवले गेले.चुकीचा मार्ग निवडून संस्था चालक व अधिकारी यांनी पवित्र क्षेत्र बदनाम करून ठेवले आहे.
  
नाशिक विभागात सर्वात भ्रष्ट जिल्हा अशी धुळे जिल्ह्याची ओळख शालार्थ आयडी प्रकरणात झाली.राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या पत्र क्रं.अशिका/आस्था क १०६ प्राथ./शालार्थ/२०२३/१९१६ या  दि.२३ मार्च २०२३ च्या संदर्भानुसार शिक्षणाधिकारी यांना जिल्हा स्तरावरून शालार्थ आयडी बाबत कार्यवाही ३१ मार्च २३ पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानंतर त्याचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करणे गरजेचे होते.मात्र धुळे जिल्ह्यातील शाळांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांचेकडून नियमबाह्य व शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकारांचा गैरवापर करून शालार्थ आयडी प्राप्त करून घेतली.शाळांच्या तपासणी शिबिरातून ही बाब उघडकीस आली आहे.वास्तविक पाहता शिक्षणाधिकारी यांना ३१ मार्च २३ नंतर अधिकार नसताना अशा प्रकारच्या परवानगी देण्यात आली हे शासनाच्या तपासणीत आढळून आले.
  
शासनाच्या निर्णयामुळे शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी अखेरीस पर्दाफाश झाला.ज्या शाळांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या सहकार्याने शालार्थ आयडी मिळवून आपल्या शाळेत बोगस शिक्षक भरती केली.
अशा शाळेतील शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.किरण कुवर यांनी २ मे २५ रोजी लेखी पत्र धुळे जिल्ह्याचे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना दिले आहे.त्यानुसार या ३७ बोगस शिक्षकांचे एप्रिल महिन्यांपासून वेतन बंद केले जाणार आहे.
  
जिल्ह्यात शिक्षण विभागात किती मोठा भ्रष्टाचार केला जातो आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बोगस शिक्षक भरती,नियुक्ती,शाळा व पदे यांना मान्यता असे प्रकार चालतात हे देखील स्पष्ट होते.त्यामुळे शासनाने शिक्षण विभागाची सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षण तज्ज्ञ,पालक,विद्यार्थी यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध