Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

सोनगीर टोलनाका परिसराला अतिक्रमणांचा वेढा वाढत्या अपघातांमुळे बाभळे फाटा ठरतोय मृत्यूचा सापळा!



शिरपूर/ प्रतिनिधी मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनगीर येथील टोल नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या संख्येने अतिक्रमणे वाढली असून त्यांनी परिसराला अक्षरशः वेढा दिला आहे.या महामार्गावरील रहदारी पाहता बाभळे फाट्यावर अपघातांची मालिका वाढली आहे.हा भाग मृत्यूचा सापळा बनला आहे. काल रात्री अंधार असल्याने याठिकाणी एका दुचाकी वाहन धारकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना घडली.यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांनी धुळे - पळासनेर टोल कंपनी व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही अतिक्रमणे वाढल्याचा आरोप केला आहे.कोणाच्या मरणाची वाट न बघता या मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
   

राष्ट्रीय महामार्ग असल्याने दिवस रात्र वाहतुकीची वर्दळ असते. अवजड वाहने मोठ्या संख्येने जात असल्याने आणि त्यांचा वेग मोठा असल्याने अपघात होतात.तसेच या मार्गावरील सोनगीर टोलनाका असून त्यामुळे वाहने सतत ये - जा करतात.
बऱ्याचदा रहदारी मुळे वाहने थांबून असतात.त्यात अतिक्रमणे वाढली आहेत.त्यामुळे त्याठिकाणी असलेली हॉटेल,टपऱ्या येथे ग्राहकांची गर्दी होते.
भरधाव वेगाने वाहने जात असल्याने दुचाकी वाहने,पादचारी,सायकल स्वार,रिक्षा यांचे अपघात होतात.त्यात अनेकांचे प्राण जाण्याची भीती असते.काही चुकी नसताना होत असलेल्या अपघातांमुळे अनेकांना दवाखाने गाठावी लागतात तर काहीना प्रचंड खर्च करावा लागतो.बरेच वाहन धारक अशा प्रसंगामुळे अपंग बनतात.सार्वजनिक रस्त्यांवर वर्दळीचा भाग असल्याने रस्ता मोकळा असणे आवश्यक असून त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. टोल कंपनी प्रशासनाने अतिक्रमणे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.मात्र तरी अतिक्रमणे वाढली असल्याने ती काढण्याची जबाबदारी त्यांची आहे.वाहन धारक टोल भरतात.मात्र त्यांची गैरसोय होते.शिवाय जीवावर बेतले जाते ते वेगळे.रस्ता तयार केल्यानंतर याठिकाणी टोल कंपनी कर वसुली करीत आहे.त्यामुळे त्यांची सर्वस्वी जबाबदारी असते.त्यांनी रस्त्यावर कोणत्याही प्रकारे अतिक्रमणे होणार नाही,जागा कब्जात केली जाणार नाही याची दक्षता घेत वाहन धारक,जनता यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली पाहिजे अशी अपेक्षा असते.परंतु अनेक वर्षे टोल वसुली करून देखील कोणत्याही प्रकारे सुविधा देत नाहीत.तसेच अपघात होतात.त्यात कंपनी व्यवस्थापन लक्ष देत नाही.कोणाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कंपनी घेणार का असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.
  

बाभळे फाट्यावर होणारी अपघातांची मालिका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी टोल कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.वारंवार होणारे अपघात,
त्यात जाणारे बळी,गंभीर जखमी,कायमचे अपंगत्व असे कटू अनुभव डोळ्या देखत पहावे लागत असल्याची खंत व्यक्त करून परिसरातील ग्रामस्थांनी टोल नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली आहे.हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनू नये यासाठी ही कारवाई करावी अन्यथा टोल कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध