Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

एक नंदुरबारवरून नेतृत्व करतो दुसरा जळगाव वरून करणार,, मग अमळनेर वाऱ्यावर सोडणार काय?

आमदार अनिल पाटील यांचा सवाल,स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची विनंती

अमळनेर:-या भूमीत आधीच एक नंदुरबारवरून नेतृत्व करतोय, दुसरा आता जळगाव वरून नेतृत्व करण्यासाठी बोलवला गेलाय, मग अमळनेरला हे लोक वाऱ्यावर सोडणार आहेत की काय?
असा सवाल आमदार अनिल पाटील यांनी जनतेला उद्देशून करत यंदा नगरपरिषदेत स्थानिक नेतृत्वालाच संधी द्यावी अशी विनंती अमळनेरकर जनतेला केली आहे.

      यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की नगरपरिषदेत नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना उमेदवाराची कार्यक्षमता व जनहीताची आवड व त्यांच्या जवळ असलेला वेळ महत्वाचा आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नगराध्यक्ष हा स्थानिकच रहिवासी असावा.कारण 24 तास तत्पर सेवा देणाराच नगराध्यक्ष म्हणून न्याय देऊ शकतो.आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. अनेक वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा देत स्वतःला त्यांनी घडविले आहे.कणखर व्यक्तिमत्व त्यांचं असल्याने व विशेष म्हणजे स्थानिक असल्याने 24 तास सेवा देणार असल्याने तसेच परिचित चेहरा असल्याने निश्चितच नगराध्यक्ष पदाचे ते लायक उमेदवार आहेत.सामान्य कुटुंबातील ते असल्याने जनतेची जाण त्यांना असेल यात शंका नाही.

     तसेच दुसरीकडे विरोधकांनी नगराध्यक्ष पदासाठी जो उमेदवार दिला आहे.मुळात ते गेल्या कित्येक वर्षांपासून अमळनेर शहराचे रहिवासीच नसून त्यांना अमळनेर मध्ये ओळखत देखील कुणी नाही.डॉक्टर म्हणून जळगाव शहरात ते वास्तव्यास आहेत.केवळ नगराध्यक्ष आरक्षण एस टी निघाल्याने केवळ हौस व पद उपभोगण्यासाठीच ते अमळनेर शहरात दाखल झाले आहेत.खरेतर नगराध्यक्ष पद हे हौसेचे नसुन एक मोठी जवाबदारी ती असल्याने त्यासाठी बाहेरगावाहून उमेदवार आम्ही आयात न करता स्थानिक व योग्य उमेदवार म्हणून जितेंद्र ठाकूर यांना आम्ही उमेदवारी दिली आहे.त्यांना मी असेल किंवा केंद्रातील खासदार स्मिताताई वाघ असतील किंवा अभ्यासू व्यक्तिमत्व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शन सतत लाभणार आहे.यामुळे त्यांना निवडून दिल्यास कुणाच्या विश्वासाला तडा जाणार नाही हे निश्चित आहे. 


      मुळात विरोधी माजी आमदारांना अमळनेरवर प्रेमच दिसत नसून बाहेरचे म्हणून दोनदा नाकारले गेल्यानंतर देखील मुद्दाम स्थानिकांवर खुन्नस म्हणून नगराध्यक्ष पदासाठी बाहेर गावचा रहिवास असलेला उमेदवार आपल्यावर लादण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. निवडणूक काळ वगळता हे स्वतः नंदुरबार येथुन दोन दोन महिने अमळनेर येथे येत नाहीत आणि यांनी दिलेला उमेदवार  नगराध्यक्ष झाल्यास तो देखील दोन दोन महिने डोळ्यांना दिसणार नाही मग आमची नगरपालिका वाऱ्यावर सोडायची का? याचा विचार अमळनेरकर जनतेने करून स्थानिक उमेदवार जितेंन्द्र ठाकूर व शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करावे अशी विनंती वजा आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध