Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

किराणा दुकान, टपऱ्यांवर सर्रास औषधविक्री; डोकेदुखीच्या गोळ्यांपासून अँटिबायोटिक्सपर्यंत खुलेआम विक्री



शिरपूर प्रतिनिधी - शहरासह ग्रामीण भागात किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि चहाच्या टपऱ्यांवर सर्रासपणे औषधांची विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला यासाठी लागणाऱ्या गोळ्यांपासून ते थेट अँटिबायोटिक्सपर्यंत औषधे कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याविना खुलेआम विकली जात आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

नियमांनुसार औषधांची विक्री करण्यासाठी वैध परवाना, प्रशिक्षित फार्मासिस्ट आणि डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. मात्र प्रत्यक्षात या नियमांना हरताळ फासून अनेक ठिकाणी बेकायदेशीर औषधविक्री सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागात डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याने नागरिक अशा किराणा दुकानदारांवर अवलंबून राहत असून, हेच दुकानदार ‘डॉक्टर’ बनून औषधे देत असल्याचे चित्र आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास चुकीचे डोस, अयोग्य औषधांचा वापर व त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः अँटिबायोटिक्सचा गैरवापर भविष्यात गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. अनेक वेळा कालबाह्य (एक्सपायरी डेट संपलेली) औषधे विकली जात असल्याचेही आढळून आले आहे.

अन्न व औषध प्रशासन( FDS) विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कायद्यानुसार ही विक्री गुन्हा असताना देखील संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे फावते आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवून बेकायदेशीर औषधविक्रीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा याचे दुष्परिणाम भविष्यात अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध