Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

धुळ्यात श्रीराम लाईफ इन्शुरन्सचा विमाधारकांना दणका; 25 दिवसांपासून कार्यालय बंद, प्रतिनिधींकडून उडवाउडवीची उत्तरे!



धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील देवपूर भागातील वाकसकर चेंबर, दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या 'श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्या कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या 25 ते 30 दिवसांपासून या कंपनीचे कार्यालय कुलूपबंद असल्याने विमाधारकांची मोठी अडचण झाली असून, कंपनीने आपली पॉलिसी विकल्यानंतर ग्राहकांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.

■ ग्राहकांना पेट्रोल पंपावर गाठून केली होती 'विमा विक्री'

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीने आपले व्यावसायिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी धुळे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर आपल्या प्रतिनिधींची फौज तैनात केली होती. पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना गाठून, त्यांना विविध योजनांची स्वप्ने दाखवून विम्याचे जाळे ओढण्यात आले. विश्वासापोटी अनेक नागरिकांनी या कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केल्या. मात्र, आता जेव्हा ग्राहकांना कामासाठी किंवा काही माहितीसाठी कार्यालयाची गरज भासत आहे, तेव्हा त्यांना कार्यालयाला टाळे लावलेले दिसत आहे.

■ उडावाउडवीची उत्तरे आणि ग्राहकांची मोठी लूट

विमाधारकांनी कार्यालयात जाऊन विचारणा केली असता, ते गेल्या 25 ते 30 दिवसापासून बंद असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती न देता उडावाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, हा प्रकार म्हणजे ग्राहकांची एक प्रकारची लूटच असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कंपनीचे प्रतिनिधी विमा विकताना अत्यंत गोड बोलून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात, मात्र क्लेम किंवा कामाची वेळ आली की गायब होतात, असा अनुभव सध्या देवपूरमधील ग्राहकांना येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विमाधारकांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, संतप्त ग्राहक या विमा कंपनीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध