Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० मार्च, २०२६

नंदुरबारमधील 'त्या' १५९ कोटींच्या जमीन घोटाळ्याची 'एसआयटी' चौकशी; महसूलमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा



नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गंगापूर येथील आदिवासी जमीन गैर-आदिवासी व्यक्तीला बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या प्रकरणाने राज्य विधीमंडळात खळबळ उडवून दिली आहे. या गंभीर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली. या पथकात एका आयपीएस अधिकाऱ्याचाही समावेश असेल.

शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या १५९ कोटींच्या भ्रष्टाचार रॅकेटचा पर्दाफाश केला. गंगापूर येथील गावित आणि वळवी कुटुंबाची जमीन अग्रवाल नावाच्या बिगर-आदिवासी व्यक्तीला नियमबाह्यरीत्या भेटपत्राद्वारे हस्तांतरित करण्यात आली होती. 

धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला काही लाखांत असलेला जमिनीचा मोबदला महामार्ग विस्तारीकरणाच्या वेळी थेट १५९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या व्यवहारातील अनियमितता मान्य करत महसूलमंत्र्यांनी यातील सहभागी सनदी अधिकाऱ्यासह सर्व महसूल अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदलीचे आणि महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
"या प्रकरणामुळे सरकारचे १५९ कोटी रुपये वाचले आहेत," असे सांगत बावनकुळे यांनी रघुवंशी यांच्या सतर्कतेचे कौतुक केले. या प्रकरणात तलाठ्यापासून ते उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाणार आहे. 

तसेच, केवळ नंदुरबारच नव्हे तर मुंबईसह संपूर्ण राज्यातील आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणाचा सविस्तर अहवाल मागवण्यात येणार असून तो पुढील अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध