Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२६

थाळनेर येथे रस्ता कामावरील ११ कामगारांना अन्नातून विषबाधा; मेस चालकाची हकालपट्टी



थाळनेर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील थाळनेर-होळनांथे रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामावर असलेल्या ११ परप्रांतीय कामगारांना गुरुवारी रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. बाधितांना तातडीने थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुदैवाने उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

नेमकी घटना काय?

शिरपूर-थाळनेर-होळनांथे रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने थाळनेर येथे आपला डेपो उभारला आहे. या ठिकाणी राज्याबाहेरील अनेक मजूर कार्यरत आहेत. ५ मार्च २०२६ रोजी रात्री डेपोवरील मेसमध्ये कामगारांनी नेहमीप्रमाणे पोळी, भाजी आणि भात खाल्ला. मात्र, रात्री उशिरा अचानक काही कामगारांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला.

परिस्थिती बिघडल्याने पहाटे ४ वाजेच्या सुमारास सर्व ११ कामगारांना थाळनेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये २२ ते ५८ वयोगटातील कामगारांचा समावेश होता.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव पाटील यांनी तातडीने या कामगारांवर उपचार सुरू केले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने दुपारी सर्व कामगारांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. विषबाधा झालेल्यांमध्ये दीपक कुमार, रामभजन यादव, धीरेंद्र यादव, सहदेव बुद्धे, प्रवेश यादव, लाल बच्चन, रोहित कुमार, सम्राटकुमार, रमणकुमार, संदीपकुमार पटेल, विकास गुप्ता आणि विनोद कुमार यांचा समावेश आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीने तातडीने पावले उचलली आहेत. कंपनीचे प्रतिनिधी धनंजय महाजन यांनी माहिती दिली की, कामगारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मेस चालकावर तत्काळ कारवाई करण्यात आली असून, त्याला कामावरून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध