Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२६

वृत्तपत्रांना दीडशे टक्के जाहिरात दर वाढ द्या दिंडोरी तहसीलदारांना पत्रकारांकडून निवेदन



बापू चव्हाण दिंडोरी :-

राज्यातील वृत्तपत्र उद्योग आर्थिक संकटात सापडला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने तातडीने दीडशे टक्के जाहिरात दरवाढ द्यावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया(vom) इंटरनॅशनल फोरमच्यावतीने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. 
       राज्यात सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनाचा भाग म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू (तात्या) चव्हाण यांच्यासह पदाधिकारी संदीप गुंजाळ अमोल जाधव,गोरख जाधव,यांनी यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.शासनाच्या योजना,निर्णय व धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रांद्वारे केले जाते.मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या उद्योगावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
सन २०१९ पासून कागद,प्रिंटिंग साहित्य,केमिकल्स,वीज व मनुष्यबळ या सर्व खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ती सुमारे १५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मात्र शासनाच्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठा फटका बसत आहे.अनेक वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
      व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.त्यामध्ये १५० टक्के जाहिरात दरवाढ लागू करणे,ई-टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे,किमान २०० चौ.से.जाहिरात आकार निश्चित करणे यांचा समावेश आहे.तसेच शासकीय जाहिरातींचे देयक ३० दिवसांच्या आत अदा करण्यात यावे आणि विलंब झाल्यास व्याज देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पत्रकारांसाठीही सुविधा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्यांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी,तसेच २० वर्षे सेवा व ५५ वर्षे वय पूर्ण झालेल्या पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.तसेच जाहिरात वितरणात लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी मिळावी,सर्व जाहिराती माहिती व जनसंपर्क विभागामार्फतच देण्यात याव्यात आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी निवेदन वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध