Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

🚨 “शेतकऱ्यांचा आक्रोश; ‘शिरपूर फर्स्ट’चा इशारा – वाढीव नुकसान भरपाई द्या, अन्यथा ठिय्या आंदोलन!”



शिरपूर तालुका व धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज “शिरपूर फर्स्ट” संघटनेच्या वतीने धुळे उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदन देताना कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत कांदा, मका आणि केळीची पिके गळ्यात टांगून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांची जाणीव करून देण्यात आली.

शिरपूर तालुक्यात जानेवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर आणि परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या भागातील शेतकऱ्यांना अद्यापही अपेक्षित वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशी खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच, 2 एप्रिल रोजी धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील सुमारे 30 गावांतील शेतीचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनाही तात्काळ वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, अनेक शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम अद्याप थकीत असून ती लवकरात लवकर वितरित करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास येत्या सात ते आठ दिवसांत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, प्रशांत राजपूत, हंसराज चौधरी , शेतकरी संघटनेचे ईश्वर पाटील उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध