Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जून, २०२०

स्वभाव...!



"हाताची सर्व बोटे सारखी नसतात" तसे प्रत्येक व्यक्ती भिन्न स्वभावाची असते. "व्यक्ती तितक्या प्रकृती" काही भित्री, काही धीट, काही लाजाळू तर काही प्रेमळ. काही रागीट तर काही शीघ्रकोपी. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा,बोलण्याचा,वागण्याचा बाज निराळा. त्यामुळे परक्यांशी बोलताना जरा जपून बोलले जाते. सहवासात राहून माणसाचा स्वभाव कळतो. बोलण्यात मोकळेपणा येत असेल तर त्यांच्याशी मोकळे बोलले जाते. परंतु मितभाषी असतील त्यांच्याशी थोडक्यातच बोलले जाते. परंतु वाचाळ स्वभावाची माणसे स्वभावाने मोकळी कमी बोलणारी आतघुसमी असतात असे म्हटले जाते. स्वभावावरून बुद्धीचीही पारख होते. एकमेकांचे स्वभाव जुळले की मैत्रीचे धागे ही पक्के होतात.निराळ्या स्वभावाच्या लोकांची मैत्री होणे विरळाच. बोलघेवड्या स्वभावाच्या मनुष्याचे भविष्य कोणीही सांगू शकते. घमेंडी नि अहंकारी स्वभावाची माणसे कोणालाच आवडत नाहीत. पती नि पत्नीचे स्वभाव भिन्न असतील तर रेशीम धागे जुळायला वेळ लागतो. नाहीतर ते तुटूही शकतात. पण स्वभाव मिळताजुळता असेल तर समोरचाही त्यांच्याशी जमवून घेत असतो. काहींचे स्वभाव इतके क्रूर असतात की त्यांच्याविषयी प्रेममाया वाटण्याऐवजी घृणाच वाटते.
         शांत सालस स्वभावाची माणसे सर्वांना हवीहवीशी वाटतात. त्यांच्याशी नाते जोडायला सर्वांनाच आवडते. आपले सुखदुःख दुसऱ्याला सांगून आपले मन हलके करणारी माणसे निर्मळ मनाची असतात. त्यांच्या मनात काहीच किंतु नसतो. परंतु "गोगलगाय नि पोटात पाय" असा स्वभाव ठेवणारी माणसे थोडी घातक असतात. त्यांच्यापासून प्रत्येक जण हातभर लांबच राहतो. त्यामुळे मैत्री जोडणे स्वभावावर अवलंबून असते. कपटी स्वभाव तर कुणालाच आवडत नाही. "पोटात एक आणि ओठात वेगळे" असणारी माणसे खूपच घातक. त्यांना आपण कधीच मनातली गोष्ट सांगू शकत नाही. काही लोकं धुर्त असतात. त्यांना वाटते ते पृथ्वीवरील सर्वात जास्त बुद्धिमान होत. परंतु त्यांच्याकडून काही चांगले कार्य घडत नाही तर ते स्वतःचें नि इतरांचेही नुकसानच करतात. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याच्या स्वभावाची  माणसे तर अजूनच अडचणीची. त्यांच्यावर विश्वास ठेवणे किंवा बसणे दुरापास्तच. त्यामुळे लोक त्यांच्याशी फटकून वागतात. त्यांना आपल्या मनाच्या गोष्टी सांगत नाहीत. त्यांना मित्रही नसतात. सर्वात जास्त गोतावळा असणारी माणसे सज्जन नि सरळ मनाची असतात. त्यांना दुसऱ्यांच्या फायद्या-तोट्याशी काहीच घेणे देणे नसते. ते आपल्या कामाशी काम ठेवतात. आणि दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळही करत नाहीत. ते निर्विघ्न असतात. पण काहीजण "स्वतःचे ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून"अशा स्वभावाची असतात.अशा स्वभावाची माणसे आपण दूर अंतरावरच ठेवतो, कारण ते लोक दुसऱ्याचे वाईट चिंतत असतात. आणि दुसर्‍याचे नुकसान कसे होईल हेच पाहतात. दुसऱ्याचे नुकसान झाले की त्यांना अपरिमित आनंद होतो. त्यामुळे अशा लोकांचा मनुष्य संचय फार कमी. त्यांची वृत्ती आतून वेगळी नि बाहेरून वेगळी असते हे समोरच्याच्या ध्यानात यायला वेळ लागत नाही. काही लोक कुणाच्या "अध्यात ना मध्यात" असतात. "आपण भले आणि आपले काम भले" असे असतात.  एखाद्याने विश्वासाने डोके टेकावे म्हटले तर खांदाही देतील. जरी ते खूप काम करणार नाहीत परंतु धोक्याचीही नसतात. त्यांना दुसऱ्यांचे काहीच पडलेले नसते. ते आपल्याच विश्वात दंग असतात. काही विघ्नसंतोषी स्वभावाची माणसे संकटांची मालिकाच उभी करतात. एका संकटातून बाहेर आले की दुसरे संकट. त्यामुळे त्यांच्यामूळे उद्भवणारी संकटे सोडविताना जन्मही अपुरा पडावा. त्यांना मित्रमंडळीही टिकत नाहीत.कोणी त्यांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही. ते घराकडे येताना दिसले की घराचा दरवाजा बंद केला जातो.
            काही लोक तोंडाने इतकी अभद्र बोलतात की त्यांच्याशी बोलणे म्हणजे ओल्या शेणावर दगड मारल्याप्रमाणे आहे. त्यांच्या शब्दांशब्दांतून गरळ ओकली जाते. त्यांचा एकेक शब्द हृदयावर घाव घालतो. त्यामुळे मनेही दूभंगतात आणि त्याचा सहवासही नकोसा वाटतो. असे वाटते त्यांना न्यायला यमही घाबरत असेल. त्यामुळे ते इथेच अस्तित्व टिकवून आहेत. मेल्यावर ते नरकातच जाणार. काहीजण भांडखोर स्वभावाची असतात. त्यांच्या शब्दांतून भांडणाचाच आवेग दिसत असतो.ते स्वत: ही भांडतात नि समोरच्यालाही भांडण्यासाठी प्रवृत्त करतात. स्वतः सुखी होतं नाहीत नि दुसऱ्यालाही होऊ देत नाहीत.काही लोकं "गरज सरो नि वैद्य मरो"या प्रकारात मोडतात.काम करून घेण्यासाठी दुसऱ्यांना गोड बोलतात नि काम संपले की "तोंडाला पानेच पुसतात"
शांत नि सोशिक माणसे जीवनात खूप   काही सोसलेले आहे अशी वाटतात. काहीजण त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न करतात. अशा लोकांच्या मनाचा कधीतरी उद्रेक होतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल असेही ते चिडतात.बाकी वेळ ते खूप शांत  असतात.काहीजण उगाचच चिडखोर असल्याचा आविर्भाव दाखवतात नि समोरचा खरोखरच चिडला असेल तेव्हा आपली नांगी टाकतात.
        काही देवभोळे लोक सात्विक नि सोज्वळही असतात. ते माणुसकी जपतात आणि नात्यांची फार कदर करतात.दुसऱ्यांना काय वाटेल आणि त्यांना चांगले वाटावे असाच त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या शब्दांनी ते दुसऱ्यांना अजिबात दुखवत नाहीत. त्यांना इतर देववृत्तीची माणसं म्हणून संबोधतात. ते आपला संयम कधीही ढळू देत नाहीत.स्वार्थी आणि कपटी लोकांच्या ते वाऱ्यालाही जात नाहीत. किंवा त्या लोकांना ते जवळही करत नाहीत.आपला जन्म जणू धर्मकार्यासाठी झाला आहे असे समजून ते आपला सारा वेळ जपजाप्य पूजा-अर्चा यातच ते व्यतित करत असतात. संत सज्जन व्यक्तीला आज समाजात खूप इज्जत असते, तशी अभद्र बोलणार्‍यांना मुळीच नसते. ते मानव जातीला कलंक असतात. प्रत्यक्ष जन्मदातेही त्यांना कंटाळून जातात. त्यांच्या जगण्याला काही अर्थ नसतो.ते मृतप्राय आयुष्य जगत असतात. पण 'स्वभावाला औषध नसते' या उक्तीप्रमाणे ते आपला स्वभाव बदलत नाहीत आणि स्वतःचे आयुष्य नरकमय करतात. आपण यापैकी कोणत्या स्वभावात बसतो हे ज्याचे त्याने ठरवायचे असते व त्रुटी सुधारून त्यात बदल घडवून आणायचे असतात. नाहीतर आपणास पाहून लोक तोंड फिरवू लागतील. तर जगणे म्हणजे मरण होईल. सरळ पापभीरू स्वभाव असेल तर जगात त्याला मान सन्मान मिळतो. नि त्यांचे नावही जगभर उंचावले जाते.

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध