Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

पारंपरिक पिकांना फाटा देत टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग...!



मालपूर ता. शिंदखेडा परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत मालपूर परिसरातील  शेतकरी श्री.नामदेव तावडे यांनी शेतीमध्ये बदल करीत टरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून भरघोस उत्पन्न घेत चांगली  प्रगती साधली आहे.

याची दखल कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत राहुल सुर्यवंशी यांनी घेतली.
पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. 

मात्र त्यांना ही गणिते न पटणारी आहेत. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे. त्यांनी  एक एकरा पासून सुरुवात केली. मॅक्स आणि शुगर बेबी जातीच्या टरबूज पिकाचे तीन एकरात एकरी 30 टन उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.  या भागात प्रामुख्याने कांदा, गहू, मिरची, ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो; मात्र तावडे यांनी आपल्या बंधूंच्या साथीने टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले. त्यांनी सहा बाय दीड फूट अंतरावर सरी तयार करून त्यावर ड्रीप, मल्चिंग पेपर, शेणखत टाकून पूर्वतयारी केल्यानंतर त्यावर उच्चप्रतीच्या टरबुजाची लागवड केली. सर्व तयारी करीत असताना त्यांनी रासायनिक खताचा अतिरेक टाळून सेंद्रिय खताला प्राधान्य दिले. तसेच कीटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर केला. यामुळे खर्चात जवळजवळ ४० टक्यांनी बचत झाल्याचे ते सांगतात. पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही, 

त्यामुळे आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केल्याने आर्थिक नियोजनही चांगले होत असल्याचे  ते सांगतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध